महेंद्र कुंभारे,

www.janvicharnews.com
महाराष्ट्राच्या इतिहासाला फितुरीची परंपरा आहे. छत्रपती शिवरायांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना जितका त्रास मुघलांचा झाला नसेल तितका त्रास स्वकीयातील फितुरांनी दिला. आणि याच फितूरीमुळे छत्रपतींचे दिल्लीपर्यंत अटकेपार झेंडा रोवण्याचे स्वप्न भंगले. शिवाय अणाजी पंतांसारख्या घरभेदीं फितूरांमुळे दोन्ही छत्रपतींना प्राणास मुकावे लागले. यामुळे महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे. इतिहासाच्या याच प्रकारची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली असून तब्बल ५६ वर्ष राजकारणात तळ ठोकुन बसलेल्या शिवसेनेला सुरुंग लावण्याचे काम स्वपक्षातीलच आमदारांनी केले आहे. यांचा म्होरक्या शिंदे असून पडद्यामागून दिल्लीची महाशक्ती कमळाबाई असल्याचे आता लपून राहिले नाही. पुरोगामी महाराष्ट्राचे राजकारण हाणामारीच्या वाटेवर! गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रात राजकारणाचा जो नंगानाच सुरु आहे. त्याला जनता अक्षरशः कंटाळली आहे. इतक्या नीच पातळीवर राजकारण घसरु शकते, हे आज जनता पाहत आहे. शिवाय लोकशाही अबाधित रहावी म्हणून कार्यतत्पर असायला हवे ते सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. ज्या शिवसेना पक्षाने तुम्हाला निवडणुकीत तिकिट दिले, ए.बी.फाॅर्म दिले, बाळसाहेबांच्या विचाराने, आशिर्वादाने निवडून दिले, मोठमोठी पदे भोगली, अमाप पैसा, प्रसिध्दी, मान सन्मान मिळवून दिला. त्याच पक्षाच्या जीवावर शिंदे गट उठले आहे. ज्याचे मीठ खाल्ले त्याच्याच पाठीत खंजीर खुपसून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आमचाच असा दावा गद्दार शिंदे गटाने केला. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच हे आख्ख्या जगाला माहित असताना शिवाय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीनुसार ११ लाखाहुन अधिक प्राथमिक सदस्य तर अडीच लाखाहून जास्त पदाधिकारी असल्याची कागदपत्रे दिली. तरीही निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हासह शिवसेना हे नावही गोठविले. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने हा निर्णय अवघ्या ४ तासात तातडीने घेतला. त्याआधी सर्वोच्च न्यायालयाकडे १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना न्यायालयाने निवडणूक आयोगाला चिन्हाबाबत निर्णय घेण्याची मुभा दिलीच कशी? हा प्रश्नच आहे. धनुष्यबाण या चिन्हासह शिवसेना हे नावही गोठविल्यामुळे फितूरांनी डाव साधलाच अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. ✍️