👉🏿 संविधानाने आपणास काय दिले व ते आपण समजून घेणे का गरजेचे आहे?
प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या देशाचे संविधान समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रतिष्ठित तथा सन्मानजनक जीवन बहाल करण्याविषयी भाष्य करते. याचे मूळ कारण म्हणजे भारतीय संविधान हे प्रचंड संघर्षातून निर्माण झालेले असून यात जी आदर्श व मुल्ये आहेत, ती आमच्या महापुरुषांनी सामना केलेल्या राजकीय तथा सामाजिक स्वातंत्र्य लढ्यांमधून प्रतिबिंबित आहेत. ह्या दोन्ही लढ्यांचे नेतृत्व करणाऱ्या तथा यांमध्ये सहभागी असलेल्या आमच्या सर्व महापुरुषांनी भारतीय जनतेला सोबत घेऊन उद्याच्या आदर्श भारताचे पाहिलेले स्वप्न म्हणजे आपले भारतीय संविधान आहे आणि या स्वप्नामध्ये अधिक गडद व अर्थपूर्ण रंग भरण्याचे महान कार्य केले ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. संविधानाने आपल्या भारतीय समाजात केवळ राजकीयच नव्हे, तर आर्थिक तथा सामाजिक क्षेत्रात देखील एक अभूतपूर्व अशी क्रांती घडवली. संविधान लागू होण्यापूर्वीच्या भारतातली सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती आणि संविधान लागू झाल्यानंतर त्यात झालेला आमूलाग्र बदल, ही संविधानाने घडवलेल्या क्रांतीचीच फळे आहेत.
केवळ वर्णव्यवस्थेमुळेच नव्हे, तर उतरंडीच्या आधारावर असलेल्या जातीव्यवस्थेमुळे नाकारण्यात येणाऱ्या सर्व समाजघटकांना कायद्यापुढे कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांसोबत समान दर्जा तथा कायद्याचे समान संरक्षण संविधानाने बहाल केले. आज भारतीय समाजातील सर्वच समाज घटकांना लिहीण्या वाचनाच्या अधिकारासोबतच विविध माध्यमातून अभिव्यक्त होण्याचे अधिकार देणारे संविधानच आहे. संविधान लागू होण्याअगोदर ही व्यवस्था सर्वांसाठी मूळीच नव्हती. अगदी उपजिवीकेचे साधन निवडण्याचे नसलेले स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानाने दिले. यातूनच आर्थिक न्याय्य समाजाची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली. ‘एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य’ ह्या तत्वावर आधारित राजकीय क्षेत्रात व्यवस्था निर्माण करुन प्रत्येक नागरिकाला राजकीय महत्त्व प्राप्त करून दिले. शिवाय गणराज्य व्यवस्था अंगिकारून कोणत्याही भेदभावाशिवाय राजकीय पदांवर विराजमान होण्याचा अधिकारही प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला.
पुरुषप्रधान संस्कृतीत महीलांना सन्मान मिळवून देत अनुच्छेद-१५ च्या खंड (३) च्या माध्यमातून महिला कल्याणासाठी झुकते माप देण्यात आलेले आहे. महिलांसाठी संविधान खरं तर एक वरदान आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला भगिनींना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी ही संविधानानेच उपलब्ध करून दिलेली आहे.
कोणत्याही भारतीय नागरिकाला स्वतः वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा देखील अतिशय महत्त्वाचा असा अधिकार संविधानाने मिळवून दिला. संविधान लागू होण्याअगोदर ही व्यवस्था सर्वसामान्यांसाठी अतिशय दुर्मिळ होती. अगदी ‘संविधानाने आम्हाला काय दिले?’ हा प्रश्न उपरोधिकपणे विचारणाऱ्या संविधान विरोधकांना तो विचारण्याचे धाडस देखील संविधानानेच दिलेले आहे. कारण संविधान लागू होण्याअगोदर जी काही व्यवस्था आपल्या येथे होती, तिला खरच हा प्रश्न विचारण्याची सोय कोणाला होती का? संविधानाने आपल्याला काय काय दिले, ही यादी खुप मोठी आहे. आणि ते सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला संविधानाच्या अंतरंगात डोकावून बघणे गरजेचे आहे.
👉🏿 संविधान जाणून घेणे का गरजेचे आहे?:- संविधानाच्या माध्यमातून भारतात सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनात अभूतपूर्व क्रांती झाली, हे जरी खरे असले, तरी अद्यापही ही क्रांती अपुर्ण आहे. आजही अनेक समस्या आम्हा सर्वांसमोर आहेत. बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, महीलांच्या समस्या, आदिवासी बांधवांच्या समस्या, सर्वच मागासवर्गीय बांधवांच्या समस्या, अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या, अशा अनेक समस्या आजही आहेत. ही यादी बरीच मोठी करता येऊ शकते. ह्या सर्व समस्या अद्यापही आहेत किंवा त्यात नवनवीन समस्यांची भर पडत आहे, हे जरी खरे असले तरी याचे कारण म्हणजे संविधानात काही कमतरता आहे, असे अजिबात नाही. तर ह्या ज्या काही समस्या आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी झाली नाही किंवा होत नाही, हे आहे. भारतीय नागरिकांनी संविधानाचे अंतरंग व्यवस्थितपणे समजून घेऊन त्यानुसार शासनाला अंमलबजावणी करण्यास भाग पाडले नाही, हे कटू सत्य आहे. लोकशाही शासनव्यवस्थेत जागरूक मतदाता हा ह्या व्यवस्थेचा मुख्य कणा असतो. परंतु हे गृहीतकच बहुसंख्य भारतीयांच्या लक्षातच आलेले नाही. वर नमूद केलेल्या किंवा आपणास वाटत असलेल्या सर्व समस्या ह्या संविधानाच्याच माध्यमातून सुटू शकतात. यासाठी आवश्यक आहे ती संविधानाला जाणून घेऊन त्यानुसार त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्यास व्यवस्थेला भाग पाडण्याची. संविधानाच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपण आपले जीवन अधिक आनंदी, सुखी व समृद्ध करू शकतो. संविधान हाच आम्हा सर्व भारतीयांच्या सुखी, समृद्ध तथा प्रतिष्ठापुर्वक जगण्याचा आधार आहे. पण तो नक्की कसा? हे संविधानाचा अभ्यास केल्याशिवाय समजणे शक्य नाही आणि म्हणूनच आपणास आपल्या संविधानाचे अंतरंग त्याच्या प्रत्येक अनुच्छेदानुसार जाणून घ्यावे लागणार आहे. यात असलेली कायद्याची अवघड भाषा ही ते आपणास अपेक्षेनुसार समजून घेण्यातला निश्चितच एक अडथळा आहे, हेही नाकारता न येणारे वास्तव आहे. नेमकी हीच समस्या सोडविण्यासाठी व आपल्या सर्वांना संविधानाचा प्रत्येक अनुच्छेद सर्वांगाने समजून देण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत “आपले संविधान… राज्यपद्धतीच नव्हे, तर जीवनपद्धती” नावाची एक केवळ दोनच मिनिटांची लेखमाला. या लेखमालेच्या माध्यमातून आपणास केवळ त्या अनुच्छेदाचा शब्दशः अर्थच सांगितला जाणार नाही; तर त्या त्या अनुच्छेदाची पार्श्वभूमी, त्या अनुच्छेदाच्या अनुषंगाने बनवण्यात आलेले कायदे व योजना, त्या संबंधित असलेल्या घटनादुरुस्त्या, तसेच इतर अत्यावश्यक माहिती देखील अगदी साध्या व सोप्या पद्धतीने आपल्यासमोर मांडली जाईल. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण निश्चितच ह्या लेखमालेच्या माध्यमातून संविधानाचे अंतरंग जाणून घेऊन तो इतरांनाही समजावा, यासाठी ही लेखमाला आपल्या सर्व परिचितांपर्यंत पोहोचवून ह्या संविधान जनजागृतीच्या उपक्रमात सहभागी व्हाल, अशी अपेक्षा आहे.
उद्या सकाळपासून ही लेखमाला आपल्या गृपवर प्रसारित केली जाईल. आपण ती वाचून ह्या संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपल्या किमान ७५ बंधू आणि भगिनींपर्यंत ती पोहोचवाल, एवढीच अपेक्षा.
✍️ नुरखॉं पठाण