काळ्या टोपीवाल्या राज्यपालाचे वस्त्रहरण…!

महेंद्र कुंभारे


राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे. त्यामुळं त्याबद्दल आदर राखून महाराष्ट्राच्या माजी राज्यपालांची व्यक्ती म्हणून झाडाझडती घेण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेचं वस्त्रहरण काल सर्वोच्च न्यायालयात झालेलं होतं. इतका बेमुर्वतखोर राज्यपाल, देशातील कोणत्याही, राज्यानं पाहिला नसावा. मुख्यमंत्रीपदाला उद्धव ठाकरे लायक नव्हते असं विधान करताना, या घटनाद्रोही राज्यपालांना लाज वाटायला हवी होती.”मुख्यमंत्र्यांनी मला विमानातून उतरवलं होतं म्हणून विधात्यानं त्यांना सत्तेवरुन उतरवलं” असंही विधान या राज्यपालानं केलं होतं. उध्दव ठाकरे हिंदुत्वापासून, दूर जात आहेत काय ? असा सवाल फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन करणाऱ्या राज्यपालांना, राज्यघटनाद्रोही म्हणून, राष्ट्रपतींनी हाकलून द्यायला हवं होतं. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदास, लायक असतील-नसतील, हे मतदार ठरवतील. पण आपण राज्यपाल पदाची अब्रु घालविण्यासाठी, आपलं कौशल्य पणाला लावलं होतं त्यावेळी आपण राज्यपाल पदास लायक होता काय ? हे स्वतःला विचारावं.


आज सर्वोच्च न्यायालयात, राज्यपालांच्या भूमिकेचं समर्थन करताना ऍडव्होकेट जनरल तुषार मेहता, यांना मान खाली घालावी लागली. ही त्यांच्यासाठीही शरमेची बाब आहे. देशाचा पैसा खर्च करून ऍडव्होकेट जनरल यांना माजी राज्यपालांच्या समर्थनार्थ, का सर्वोच्च न्यायालयात,पाठविलं असा प्रश्न पडतो. म्हातारचळ लागलेले हे गृहस्थ राज्यपाल पदावरुन पायउतार झाल्यावर मळमळ ओकतात. राज्याच्या राज्यपालांनी, परराज्यातील नागरिक बाहेर गेले तर, महाराष्ट्र भिकेला लागेल असं चितिंनं हा नागरिकांशी द्रोह होता. मराठी ताटातील, मराठी अन्न खाऊन, राज्याची निंदा करणं, यासारखी बेईमानीची गोष्ट कोणती असू शकेल ? महात्मा फुले-सावित्रीबाई फुले या दांपत्याबद्दल, गरळ ओकतो. पुन्हा कोश्यारींचं समर्थन करायला इथली बेशरम फौज तयार होती. आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची अब्रु, माजी राज्यपालांमुळं, गेलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागेल, की न्याय मिळेल हा नंतरचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राची अब्रु घालविण्यासाठी, भगतसिंग कोश्यारी यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. काळ्या टोपीखाली काय, काय दडलं होतं. ते आता बाहेर येत आहे. महाराष्ट्रातील ज्या लोकांनी कोश्यारींचं समर्थन केलं होतं त्यांना लाज असेल तर, त्यांनी आपली चूक कबूल करायला हवी.


कोश्यारींसारखे आणखी चार-पाच मध्ययुगीन ढुढ्ढाचार्य असतील, तर देशाच्या राज्यघटनेची वाट लागेल. देशाची घटनात्मक रचना विस्कटून टाकण्याची चढाओढ सुरु झालेली आहे. त्यापैकीच एक भगतसिंग कोश्यारी होते. असली पारोश्या मेंदूची माणसं जपून ठेवलेली आहेत त्यांनी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला लांच्छन लावलं होतं. हे सर्वोच्च न्यायालयानं, स्पष्ट केलं आहे. कॉंग्रेसच्या राज्यातही काही सारं आलबेल होतं,अशातला भाग नव्हता. पण त्यांच्यामध्ये थोडीतरी,शरम बाकी होती. पण आज ही माणसं,आपल्याच देशाचे, नागरिक आहोत काय? असं विचारण्याची पाळी आली आहे. इतकी धुळधाण चालू आहे.भगतसिंग कोश्यारी यांना, राष्ट्रपतींनी पदमुक्त केलं, हे बरं झालं. अन्यथा सर्वोच्च न्यायालयात, सत्ता संघर्ष चालू असताना, त्यांच्या पदावर राहण्यानं लक्तरं वेशीवर आली असती. भगतसिंग कोश्यारी आणि महाराष्ट्राचं, काहीही वैर नव्हतं. पण, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. राज्यपाल निःपक्षपाती असायला हवा असतो. या आधीही अनेक राज्यपालांनी गुण उधळले होते. इतकेच नव्हे तर, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना के.के.तिवारी नामक विदुषकानं,अर्वाच्य भाषा वापरली होती. त्यावेळी कॉंग्रेसचे नेते समाजवादी मधु लिमये यांच्याकडं आले होते. आणि सल्ला घेतला होता की, राष्ट्रपती केंद्र सरकार बरखास्त,करु शकतात काय ? त्यावर लिमयेंनी सांगितले होते की, ते सरकार बरखास्त करु शकतात. पण तो अधिकार त्यांना, असो वा नसो. तुमच्या सदस्यांचं वर्तन, असंसदीय आणि असहिष्णू आहे. त्यांना आवर घालावा. आणि घटनेची बूज राखावी. आजचे सदस्य के.के.तिवारी यांच्याही पुढं गेले आहेत.पण मधु लिमये कुठं आहेत ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top