कृषी क्षेत्रातील करिअरच्या काळानुरूप संधी

कृषी क्षेत्रातील करिअरच्या काळानुरूप संधी

शेती हा मानवाचा आदय व्यवसाय आहे. हा मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन व्यवसाय आहे. औदयोगिकीकरणापूर्वीच्या काळापर्यंत शेती हा सर्वाधिक प्रतिष्ठेचा व्यवसाय मानला जात असे. शेती व्यवसायावरच संपूर्ण देशातील गावे स्वयंपूर्ण होती, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या तीन टप्यांत व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे मोजमाप केले जात असे. औद्योगिक क्रांतीनंतर झालेल्या स्थित्यंतरात कारखान्यांमध्ये रोजगाराच्या सहज उपलब्धतेमुळे हा क्रम उलटा होऊन नोकरी सर्वोत्तम मानली जाऊ लागली पन्नासच्या दशकानंतर यांत्रिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रात आलेल्या बदलांबरोबरच शेती क्षेत्रातही सकारात्मक बदल दिसू लागले जगभरात व्यावसायिक तत्त्वावर यांत्रिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात झाली. त्याचे पडसाद भारतातही मोठ्या प्रमाणात दिसु लागले आहेत. आज आपल्याकडे ऊस, कापूस, द्राक्ष अशा नगदी पिकांच्या उत्पादनासाठी यांत्रिक पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जातो, तर तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका आणि कडधान्ये अशा पिकांच्या उत्पादनातही काही प्रमाणात यांत्रिकीकरण होऊ लागले आहे.

मधल्या काळात केवळ उदरनिर्वाहाचे साधन असलेला शेती व्यवसाय आज आधुनिक तंत्रज्ञान, संशोधित बी-बियाणे फायदेशीर झाला आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जमिनींचे तुकडीकरण होऊन दरडोई शेतीयोग्य जमिनींचे प्रमाण कमी झालं. तरी देखील कमीतकमी क्षेत्रामध्ये योग्य नियोजनाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून अधिकाधिक उत्पादन मिळवणे शक्य आहे पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर केल्या जाणाऱ्या शेतीला विद्यापीठीय पदवी शिक्षणाची जोड मिळाली आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण आज शेती व्यवसायाकडे वळू लागले आहेत. लोकांचे उंचावलेले जीवनमान आणि बदलती जीवनशैली यांमुळे कृषी उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये वाढ होऊन कृषी उत्पादनांची मागणी वाढली आहे. आरोग्य आणि पर्यावरणविषयक वाढत्या जागृतीमुळे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती उत्पादने विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. यामुळेच, नैसर्गिक आव्हानांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करून आज शेती व्यवसाय हा शाश्वत आणि किफायतशीर होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.

क्षेत्राची व्याप्ती

  • मुख्य व्यवसायाचे उत्पादननिहाय प्रकार:
  • अन्नधान्यात्पादन
  • नगदी पिकांचे उत्पादन
  • फुलोत्पादन, रोपवाटिका
  • मिश्र शेती
  • भाजीपाला उत्पादन
  • वनशेती
  • फलोत्पादन
  • वनौषधी, सुगंधी वनस्पती आणि मसाल्याच्या पिकांचे उत्पादन
  • शेतीपूरक व्यवसाय :
  • मधुमक्षिकापालन
  • रेशीम निर्मिती
  • सेंद्रिय खताचे उत्पादन
  • अन्नप्रक्रिया उद्योग
  • पशुपालन आणि दुग्धोत्पादन
  • मत्स्योत्पादन
  • शेळी मेंढीपालन
  • कुक्कुटपालन

शेतकऱ्यासाठी बाजारपेठेच्या संधी

अन्य कोणत्याही क्षेत्रांपेक्षा शेती या क्षेत्रात करिअरची व्याप्ती प्रचंड आहे; किंबहुना शेती व्यवसायाशी निगडित व्यक्तीने स्वतःच स्वतःसाठी विक्रीच्या संधी शोधणे आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार आपल्या उत्पादनामध्ये आवश्यक ते बदल करणे अपेक्षित असते. शेती व्यवसायात करिअर करू इच्छिणाऱ्याने बाजारपेठेतील उत्पादनाची मागणी लक्षात घेऊन त्यानुसार कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यावे, उत्पादन कालावधी, आवश्यक निविष्ठांसाठीचा (inputs) खर्च, उत्पादन बाजारपेठेत विक्रीसाठी येण्याची वेळ, वाहतूक खर्च, या सर्व बाबींचे नियोजन करून मगच विक्रीसाठी बाजारपेठ निवडण्याचा विचार करावा लागतो. उदा. आपल्याकडील हापूस आंब्याला जगभरात खूप मागणी असते. देशांतर्गत बाजारपेठेच्या तुलनेत परदेशात विक्री करून अधिक नफा मिळवता येतो. त्यामुळे, आंबा उत्पादक शेतकऱ्याने परदेशातील आबा विक्रीच्या संधी, तेथील बाजारपेठ, संबंधित देशाने गुणवत्तेबाबत निश्चित केलेली मानके यांचा अभ्यास करून बाजारपेठेची निवड करून विक्रीची संधी शोधणे आवश्यक ठरते.

शेतीमालाचे भाव हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. शेती हा असा एकमेव व्यवसाय आहे ज्यातील उत्पादनाची विक्री किंमत उत्पादक ठरवत नाही, तर व्यापारी आणि विक्रेते ठरवतात. काही अपवाद वगळता आपल्या देशातही सर्वत्र हेच चित्र दिसून येते. हे चित्र बदलून उत्पादकाद्वारेच शेतीमालाची किंमत निश्चित करण्याची व्यवस्था उभारण्यासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता असते. समान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विक्रीसाठी बाजारपेठा शोधणे, ठरावीक विक्रेत्यांनाच विक्री करून निश्चित किंमत मिळवून याचे प्रमाण कायम राखणे यांसाठी शेतकरी उत्पादक संघाची स्थापना केल्यास विक्री आणि नफा कमावण्याच्या संधी उपलब्ध होतात. अशा प्रकारचे अनेक प्रयत्न राज्यभर सुरू आहेत. त्याचबरोबर काही शेतकरी उत्पादक संघांद्वारे कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्याच्या यंत्रणा उभारण्यात येतात. त्यामुळे, उत्पादन विक्रीची निश्चिती होऊन खात्रीशीर किंमतही मिळते.

स्वतःच्या घरची शेती करणे, भाडेतत्त्वावर जमीन घेऊन त्यावर शेती करणे, गट शेती, सेंद्रिय शेती इत्यादी अनेक पर्यायांपैकी एकाची निवड करून आपण शेती करू शकतो. त्याचबरोबर शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन अधिक किफायतशीर करण्यासाठी हरितगृह, मल्चिंग, टिश्यूकल्चर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा तंत्रांचा वापर करून दर्जेदार आणि भरघोस उत्पादन घेणे शक्य आहे.

  • दैनंदिन गरजांसाठी भाज्या, फुलं, फळं, मसाले या उत्पादनांना निश्चित आणि खात्रीची बाजारपेठ उपलब्ध आहे.
  • सध्या बाजारपेठेत परदेशी फुलझाडे, भाज्या, फळे, शोभिवंत झाडे यांना मोठ्या प्रमाणावर मागणी उपलब्ध आहे.
  • अन्नप्रक्रिया करणारे मोठे उदयोजक दर्जेदार कृषिमाल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांशी करार करतात, त्या माध्यमातूनही शेतीमालाला विक्रीची आणि बाजारभावाची शाश्वती मिळू शकते.
  • कृषी पर्यटन हे आजच्या काळातील कृषी व्यवसायाशी निगडित सर्वांत उदयोन्मुख क्षेत्र आहे. कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शेतकरी चांगला नफा कमावू शकतात त्याचबरोबर त्यांच्या शेतमालाची घरच्या घरीच विक्री देखील होते.
  • दर्जेदार भारतीय कृषी उत्पादनांना परदेशी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या बाजारपेठांचा अभ्यास करून शेतीमालाची परदेशात निर्यात केल्यास देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा अधिक नफा कमावणे शक्य होते.
  • लॅण्डस्केप गार्डनिंगमधील तज्ज्ञांनाही मुबलक आणि किफायतशीर व्यवसायसंधी आज उपलब्ध आहेत. पर्यटनस्थळी स्थित मोठमोठ्या हॉटेल्स / रिसॉर्ट्सच्या इस्टेट्स आणि राजकीय / शासकीय उच्चपदस्थांची निवासस्थाने इत्यादींचे परिसर सुशोभित करण्यासाठी विशेष सौंदर्याभिरुची (aesthetics) आणि विशिष्ट रचनांचा (designs) अंतर्भाव असलेल्या ज्या बागांची निर्मिती केली जाते, त्या विकसित करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लॅण्डस्केप गार्डनिंग’ मधल्या तज्ज्ञांना विशेष मागणी आहे आणि भरघोस मोबदलाही मिळतो.

शासकीय क्षेत्रातील संधी :

‘राज्यसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील अधिकाऱ्याची भरती केली जाते. त्यासाठी कृषी विषयातील कोणत्याही शाखेतील पदवी ही आवश्यक पात्रता मानली जाते.

‘ICAR’, ‘DRDO’, ‘IARI’ या संशोधन संस्थांमध्येही करिअरच्या कृषी संशोधनासंबंधी संधी उपलब्ध आहेत. आपल्या देशात 60 हून अधिक कृषी विद्यापीठे आहेत. त्यांपैकी 4 कृषी विदयापीठे महाराष्ट्रात आहेत. या कृषी विद्यापीठांतर्गत महाविद्यालये आणि संशोधन केंद्रे, शासकीय बियाणे निर्मिती कंपन्या या ठिकाणी देखील नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.  

खाजगी क्षेत्रातील संधी :

शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके, यंत्रे, अवजारे आणि अन्य आवश्यक वस्तू निर्माण करणाऱ्या अनेक राष्ट्रीय कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्येही संशोधन आणि मार्केटिंग विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

भारतातील शेतीचा भविष्यातील विकास लक्षात घेता अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही या क्षेत्रात प्रवेश केला आहे.अशा कंपन्यांमध्ये कृषी पदवीधरांसाठी नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.

या क्षेत्रात व्यवस्थापकीय (Managerial), पर्यवेक्षकीय ( Supervisory ), सल्लागार (advisory) स्तरावरील संधी उपलब्ध होतात. तसेच, या क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी (P.G) किंवा डॉक्टरेट (Ph.D) मिळवणाऱ्यांना या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शिक्षण देणाऱ्या संस्था व विद्यापीठांमध्ये संशोधनात्मक (research) किंवा अध्यापनाच्या (teaching) चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

पीक सल्लागार :

एखादया पिकाच्या लागवडपूर्व कालावधीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रत्येक टप्यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम पीक सल्लागार करतात. नगदी पिकांचे उत्पादन घेणारे मोठे शेतकरी अशा पीक सल्लागारांची नेमणूक करतात. सध्याच्या काळातील हे एक उदयोन्मुख क्षेत्र आहे. पीक सल्लागार एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांशी करार करून त्यांच्या पिकांबाबत व्यवस्थापनाचा सल्ला देत असतो. त्यासाठी त्याला चांगला मोबदला देखील मिळतो.

बाजारपेठ विश्लेषक आणि सल्लागार :

शेतीमालाची बाजारपेठ ही मुख्यतः ग्राहककेंद्री असते. म्हणजेच, सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करूनच बहुतांश कृषी उत्पादनांची किंमत निश्चित केली जाते. अशा स्थितीत शेतकऱ्यांना अधिक नफा मिळावा यादृष्टीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा अभ्यास करून शेतकऱ्याने आपला माल कोणत्या वेळी विक्रीस आणावा याबाबत योग्य सल्ला मिळणे महत्त्वाचे ठरते. हे काम बाजारपेठ विश्लेषक आणि सल्लागाराद्वारे केले जाते. कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे.

आवश्यक गुण

कष्टाळूपणा, सृजनशीलता, संयमीवृत्ती, अफाट निरीक्षण शक्ती, आशावादीवृत्ती, नावीन्याची आवड असणे, संशोधकवृत्ती, खंबीरपणा, समयसूचकता, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, व्यवहारज्ञान, तंत्रकुशलता, प्रयोगशीलता, व्यवस्थापन कौशल्य, नैसर्गिक घटनांबद्दलचे ज्ञान, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक शिक्षण यांची उत्तम सांगड घालण्याचे कौशल्य.

अभ्यासक्रम

करिअरच्या आणि व्यवसायाच्या अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध असलेल्या या क्षेत्रातील औपचारिक शिक्षणाला आणि प्रशिक्षणाला चांगलं महत्त्व प्राप्त झालं आहे. सामान्यतः या क्षेत्रातील चांगल्या करिअर संधीसाठी या क्षेत्रातील पदवी (degree) मिळवणं आवश्यक आहे.

कृषी या विषयातील अँग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, अँग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, अँनिमल हजबंड्री, फूड टेक्नॉलॉजी, अँग्रिकल्चर इंजिनीअरिंग, अँग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट इत्यादी शाखांमध्ये B.Sc, M.Sc B. Tech, B.B.A, M.B.A, Ph.D असे शिक्षण घेता येते.

Scroll to Top