
www.janvicharnews.com
सत्तेच्या हव्यासापोटी राजकारणाचा स्थर खालावत चालला असताना लोकसभेत झालेल्या दोन मंत्र्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चा आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात नेत्यांबद्दल आदराची भावना व्यक्त होताना दिसून येते आहे. केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे मंत्री नितीन गडकरी आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भाषणे ऐकणाऱ्या जनतेला नेते किती अभ्यासपूर्ण बोलू शकतात याचा सुखद प्रत्यय देणारी होती. परंतु अन्य सताधारी मंत्री कामे तर सोडा किमान धोरणात्मक बोलणे देखील नाही. लोकसभा म्हणजे निव्वळ गदारोळ आणि खासदारांचे असभ्य वर्तन हा दृढ होत चाललेला समज या दोन मंत्र्यांनी खोडून काढला. विधिमंडळ आणि संसद हि लोकशाहीची मंदिरे मानल्या जाणाऱ्या या सभागृहाची प्रतिष्ठा अशा आश्वासक भाषणांमुळे खचितच उजळून निघत असते.
विकासाच्या मुद्यावर मतदारांना खऱ्या अर्थाने आश्वाशित करून सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा ‘मॅस्कॉट’ (शुभंकर)असे गडकरींचे वर्णन केले तरी अतिशयोक्तीचे ठरू नये. देशाच्या कानाकोपऱ्यातील दुर्गम भागांतही रस्त्यांचे जाळे विणणारे कार्यक्षम गडकरी अविश्रांत मेहनत करून विकासाच्या रक्तवाहिन्या सशक्त करीत आहेत. लेह- लडाख तसेच हिमालयाच्या डोंगर रांगातून रस्त्यांची निर्मिती, ही कामे अंदाजित खर्चापेक्षा कमी दरात आणि वेळेआधी पूर्ण करून लोकशाही सरकारमध्ये देखील कामे वेळेत केली जाऊ शकतात याचा आदर्श घालून दिला, आपल्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार करणाऱ्या गडकरींनी त्यांच्या मंत्रालयाचा लेखाजोखा घेतला. त्याबाबतचे निर्णय, आकडेवारी, विरोधकांच्या शंकांचे निरसन आणि तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती सभागृहात मांडून आपली वेगळी छबी निर्माण करण्यात ते यशस्वी मंत्री म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यात कुठेही शब्दच्छल नव्हता की अतिशयोक्ती. पारदर्शकता आणि प्रामाणिक तळमळ यांनी भारलेले हे भाषण येणाऱ्या नेतृत्वाला मार्गदर्शक ठरावे असेच ते नेहमी बोलतात.

www.janvicharnews.com
नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे. एअर इंडियाचे टाटा समुहाकडे झालेले हस्तांतरण आणि त्यावर विरोधी पक्षाची विरोधी भूमिका यावरून ते घेरले जातील असे वाटले होते. पण झाले उलटेच. श्री.शिंदे यांनी खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरण यातील मूलभूत फरक सभागृहाला समजावून सांगत मागील सरकारने एअर इंडियाची कशी दैना उडवली हे आकडेवारीसह सभागृहात मांडले. जेव्हा लपवण्यासारखे काही नसते तेव्हा विचार सुस्पष्ट उमटतात. शिंदे यांचे भाषण ऐकताना ते प्रकर्षाने जाणवले. विमानतळांची नावे, व्यवस्थापन शास्त्रातील अटकली आणि सिद्धांत याचा उपयोग करीत त्यांनी भाषणाला वास्तविकतेची धार चढवली. घराणेशाहीचा विचार करता दिवंगत मंत्री माधवराव शिंदे यांचा वारसा केवळ घराणेशाहीपुरता सीमित नाही हे ज्योतिरादित्य यांनी दाखवून एक आशावाद निर्माण केला. घराणेशाहीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला लावणारे हे भाषण होते.
लोकप्रतिनिधींकडून सर्वसामान्य भारतीयांच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी किमान अभ्यास, प्रामाणिक तळमळ आणि कामाप्रती सकारात्मकता असेल तर राजकारणाची डागाळलेली प्रतिमा पुन्हा स्वच्छ होण्यास मदत होईल.