“गुरुपोर्णिमेचा इतिहास आणि महात्म्य”

“गुरुपोर्णिमेचा इतिहास आणि महात्म्य”

शिक्षक आणि विद्यार्था सह सर्व शिक्षण प्रेमीच्या ज्ञानात भर पाडणारे विचार….

www.janvicharnews.com

भारतीय संस्कृतीमध्ये गुरुशिष्य परंपरा फार प्राचीन काळापासून आपल्याला बघावयास मिळते. ज्ञानाचे क्षेत्र कोणतेही असो ते साध्य करण्यासाठी प्रत्येकाला गुरु ची आवश्यकता असते. म्हणजेच कोणती कला व ज्ञान अवगत करण्यासाठी  गुरू हवाच. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे. गुरु आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. त्यामुळे दरवर्षी आषाढी पौर्णिमेला गुरू विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा भारताबरोबरच जगामध्ये गुरुपौर्णिमा साजरा करण्यात येते. या दिवशी सर्व विद्यार्थी आपापल्या शिक्षकाबद्दल कृतज्ञतेचा भाव त्यांच्याविषयीचा आदर त्यांना पुस्तके, फुले,बुके इत्यादी वस्तू देऊन आणि त्यांचा आशिर्वाद घेऊन व्यक्त करतात.

गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते कारण या दिवशी महर्षी व्यास या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.ज्याला व्यासपौर्णिमा असेसुद्धा म्हटले जाते. गुरु म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रुप: या साक्षात परब्रम्हाला माझा नमस्कार असो: असा गुरुमहिमा भारतीय संस्कृतीत वर्णन केला आहे . व्यास महर्षिंनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. महाभारत काळातील मोठे विद्वान, श्रेष्ठ असे व्यासमुनी होऊन गेले. त्याच्याइतके थोर व्यासंगी, ज्ञानसंपन्न गुरु अद्यापपर्यंत झाले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे.

सामान्यतः आई आपल्या बालकाची सर्वात पहिली गुरू असते. तिच्या कडून तो बालक सर्व गोष्टी शिकत असतो.म्हणूनच म्हणतात की गुरु म्हणजे ज्ञानाचे पीठ या दिवशी गुरुपूजन करणे म्हणजे सत्याचे ज्ञानाचे पूजन करणे होय. गुरुसारखा पाठीराखा असला तर शिष्याला जीवनात मार्ग सापडतो. गुरुची सुरुवात आईवडीलांपासून होते. आई ही प्रत्येकाची सर्वात मोठी गुरु आहे. आपल्या बाल मनावर अनेक चांगले संस्कार रुजवते, कितीतरी चांगल्या बाबींचे ज्ञान, चांगले विचार व सदाचार आपल्या मनावर बिंबवते, आपण अज्ञानाचे सज्ञान तिच्याच तालमीत होते. प्रेम वात्सल्य ह्या गुणांचा वारसा आपण तिच्याकडूनच उचलतो.

                       माता माझी गुरु माता माझा कल्पतरु.

ज्याप्रमाणे आपला पहिला गुरु आई याचे महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. आपल्याला अनेक गोष्टी शिकवून सर्वांगाने परिपूर्ण करणारे शिक्षक, हेच आपले दुसरे गुरु. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो तीच भूमिका शाळेतील शिक्षक पार पाडीत असतात. आई वडील आपल्याला जीवन देतात आणि गुरु शाश्वत ज्ञान व कीर्ती देतात.

 प्रकांडपंडित असलेल्या चांगदेव महाराजांनी मुक्ताई ला आपला गुरु मानले.देवा विण वाव ठाव नाही असा साक्षात्कार विसोबा खेचर यांनी नामदेवांना घडवला होता.वडा भगवंताविषयी त्यांचे अज्ञान दूर केले होते म्हणे संत नामदेवांनी विसोबा खेचर यांना आपले गुरू मानले. अर्जुनाला शस्त्रविद्या गुरु कडून मिळाली.एकलव्याला ती नाकारली गेली तरी गुरूंचा पुतळा उभारून त्याला वंदन करून एकलव्याने साधना केली आणि विद्या मध्ये असामान्य असे यश मिळवले.

 भारतीय गुरु परंपरेत गुरु – शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक – याज्ञवल्क्य, शुक्राचार्य जनक, कृष्ण – सुदामा संदिपनी, विश्वामित्र – राम लक्ष्मण, परशुराम – कर्ण,चाणक्य-चंद्रगुप्त, द्रोणाचार्य – अर्जुन,संत तुकाराम- छत्रपती शिवाजी महाराज  अशी गुरु शिष्य परंपरा आहे. यावरून आपल्याला गुरुची महती त्यांचे असामान्य महत्त्व दिसून येते.

  गुरूंचे महत्त्व आणि गुरुशब्दाचा अर्थ

  शिक्षक हे आपले गुरुच आहेत.त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ‘शिक्षकदिन’ साजरा करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थसमजून घेऊया. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात. विद्या हे एक महान दैवत आहे. विद्यादान करण्याचे महान व पवित्र असे कार्य गुरु करतात. म्हणूनच

गुरु म्हणजे ज्ञानाची गंगोत्री सरस्वतीची अमृतवाणी,

गुरु म्हणजे  सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ,

 गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाचा मार्ग दाखवणारा

 गुरु म्हणजे शिष्याने आपल्या पुढे जावे अशी मनोमन इच्छा बाळगणारा

गुरु म्हणजे भावी पिढीचा शिल्पकार, गुरु म्हणजे दयेचा सागर,

गुरु म्हणजे  केवळ लोकांच्या कल्याणासाठीच झटणारा,

गुरु म्हणजे  निस्वार्थी ज्ञान दान करणारा,

गुरु म्हणजे  आपण आपल्यासाठी जगायचे नसते, तर राष्ट्रासाठी जगायचे असते असे संस्कार करणारा.

गुरु म्हणजे वेगवेगळे विषय निःस्वार्थीपणे शिकवून आपल्याला प्रगतीच्या शिखरावर पोहचविणारा.

  गुरुविना कोणाच्याही जीवनाचा मार्ग सफल होऊ शकत नाही. कारण दिपस्तंभाशिवाय आपली नौका किनाऱ्याला सुरक्षितपणे पोहोचवू शकत नाही. कोकिळेच्या आवाजात जरी माधुर्य असले तरी कंठ फुटण्यास जसा वसंत ऋतुच यावा लागतो, त्याप्रमाणे मनुष्याजवळ ज्ञान उपजत असले तरी ते फलद्रुप होण्यासाठी त्याला गुरु पासून चालना मिळावी लागते. लोखंड जसे परिसाच्या स्पर्शाने सुवर्ण बनते. त्याप्रमाणे गुरुच्या ज्ञानदानाने शिष्य कृतार्थ होतो.

आज संस्कृतीचे अवमूल्यन मोठ्या वेगाने होत आहे. गुरु अर्थात शिक्षकाने वर्गात अपमान केला किंवा अभ्यासाबद्दल विचारले तर वेळप्रसंगी त्या गुरुला किंवा शिक्षकाला मारहाणसुद्धा केली जाते. अशा परिस्थितीमध्ये मुलांना गुरु आणि त्यांचे महात्म्य यांचे ज्ञान मिळणे आवश्यक असते त्यामुळे प्रत्येक घरात शाळेत शैक्षणिक संस्थेमध्ये गुरु पौर्णिमा साजरी झाली पाहिजे. यासाठी हा लेखन प्रपंच, गुरुविषयीचे सार खालील दोन ओळीत आपल्याला सापडेल.

गुरुसमान कुणी नाही सोयरा ।गुरुविण नाही थारा ।।
गुरु निधान गुरु मोक्ष । गुरु हाच आपुला आसरा ।।

Scroll to Top