छत्रपतींच्या भोसले कुळाचे तथाकथित काल्पनिक सिसोदियाकरण व भोसलेंचे होयसळ मूळ!!

छत्रपतींच्या भोसले कुळाचे तथाकथित काल्पनिक सिसोदियाकरण व भोसलेंचे होयसळ मूळ!!

सध्याच्या सिसोदिया राजपूतांचे पूर्वज जे की महाराष्ट्रातील मुंगीपैठण येथून प्राचीन काळी झालेल्या सत्ता संक्रमण काळात पलायन करून वा स्थलांतरित झालेल्या शिसोदे या महाराष्ट्रातील मूळचे असलेल्या कुळाचे वंशज असल्याचा दावा केला जातो.परंतु या दाव्यात किती तथ्य आहे हे आपण पाहू.विशेषत: इस१३०३पासुन पुढील काळात दिसणारा हमीरसिंह सिसोदिया यापासून चितोडकरास,मेवाडकर,उदयपूरकरांच्या पूर्वजांस सिसोदिया ‘म्हटले गेले’,अर्थात १४व्या शतकाच्या आरंभी हे राजपूत ‘सिसोदिया’ म्हणून ओळखले जाऊ लागले व हमीर हा सार्वमताने आद्य सिसोदिया ‘मानला जातो’.तेव्हा हा काळ ‘प्राचीन’ नसून ‘मध्ययुगीन’ आहे हे प्रथमतः ध्यानात घ्यावे.

या घटनेकडे बारकाव्याने पाहिले की हे लक्षात येते की हमीरसिंहाची वंशावळ ज्या बाप्पा रावळ उपाख्य कालभोज या ८व्या शतकातील राजापर्यंत मागे नेली जाते त्याच्या पासून या हमीर पर्यंतच्या मधल्या काळातील शिलालेखात,ताम्रपटात कोठेही यांचा मुंगीपैठणचे प्राचीन शिसोदे हा उल्लेख अजिबात सुद्धा आलेला नाही.हा मुद्दा सोयीस्करपणे दुर्लक्षित ठेवण्यात आला आहे.बघा! म्हणजे ज्याच्यापासून सिसोदिया वंश चालू झाला असा ‘दावा’ केला जातो,चक्क त्या व्यक्तीच्या मागच्या पिढीतील एकानेही आपणास मुंगीपैठणचे सिसोदिया वा अगदी मूळ शिसोदे संबोधू नये ही किती विपर्यस्त विसंगती वाटते पहा!

आणखी एक मांडणी सातत्याने होत असते ती अशी की महाराष्ट्रातील शिसोदे सातवाहन काळात झालेल्या राजकीय संक्रमणावस्थेमुळे पलायन करून,स्थलांतरित होऊन विंध्य पर्वत सातपुडा भागातून पुढे केव्हा तरी(?) राजस्थानच्या मेवाडला गेले वगैरे अशा धाटणीचे मत दर्शविणारे एका पुस्तकातील पान नेहमी इतरत्र समाजमाध्यमांवर फिरवले जाते व काहीजण त्याचाच आधार घेऊन आपली मांडणी करताना दिसतात.तर हे लेखन इतिहास संशोधक प्रा.रा.आ.कदम लिखित ‘मराठा ९६कुले’ या ग्रंथात आले असून या ग्रंथाचे संकलक मो.के.कुंटे असून सहयोगी ॲड.प्रसन्न घ.जगताप हे आहेत.हा ग्रंथ जानेवारी २०१२ मध्ये प्रकाशित झाला व तीच त्याची प्रथमावृत्ती होय.सदर ग्रंथामध्ये पृ.३६ वर उल्लेखीत तो मजकूर असा :- “शिसोदे राजवंश शालिवाहनाच्या वेळी इसवी सनपूर्व १३५ सुमारे,उजैनीच्या विक्रमादित्याच्या दक्षिणेतील आक्रमणाने नष्टप्राय व स्थानभ्रष्ट होऊन सातपुडा व विंध्य या मार्गे मेवाडात गेला”,इत्यादी…ग्रंथकर्त्याने या मांडणीला कोणताही ‘समकालीन’ पुरावा दिलेला तर नाहीच,शिवाय याच ग्रंथात शिसोदे हे “इसपूर्व १३५सुमारे” या शालिवाहन काळात मेवाडात गेल्याचे वरीलप्रमाणे म्हटले आहे व याच पानावर लगोलग खाली तेच शिसोदे “इ.स.१३५” मध्ये गौतमीपुत्र सातवाहन व पुळुमावी यांच्या काळी तिकडे गेल्याचे सांगितले आहे,एकाच ठिकाणी अशी विसंगत व परस्पर विरोधी माहिती दिलेली असल्याने नेमका कोणता काळ गृहीत धरायचा,इसवीसन पूर्व१३५ की इसवी सन१३५? हा मोठाच प्रश्न उपस्थित होतो ज्याचे उत्तर अस्तित्वातच नाही.तत्राप विक्रमादित्य सम्राटाची निश्चित कारकीर्द त्यांनी दिलेली नाही.महत्वाचा मुद्दा म्हणजे शालिवाहन अर्थात सातवाहनांच्या काळात हे स्थलांतर झाल्याच्या मांडणीला आधार म्हणून शालिवाहनांच्या पतनानंतर “अतिअतिअतिअतिअतिउत्तरकाळात” लिहिल्या गेलेल्या ‘मेवाडच्या भाट लोकांचे राजकुलाख्यान’ याचा आधार देण्यात आला आहे(मराठा कुले,पूर्वोक्त पृ.३६).आता मात्र या मांडणीवर वाचकांनीही व ही मांडणी ग्राह्य धरून सिसोदिया सिद्धांताला नाहक दुजोरा देणारांनीही आपला विवेक जागृत ठेवून हे सांगावे की सातवाहनांचे साम्राज्य पतनाला गेल्याच्या सुमारे-सुमारे- सुमारे-सुमारे-सुमारे सहस्त्राधिक वर्षानंतर वेळोवेळी वेगवेगळी माहिती घालून पूर्ण केले गेलेले एका घराण्याचे ‘भाटकृत वर्णन’ समकालीन साधनांचा यत्किंचितही आधार नसताना सत्य मानण्याची अनुमती इतिहास लेखनशास्त्र देतेय काय?हे ग्राह्य धरता येते काय?

सोबतच ही मांडणी दाखवून भोसले हे कसे सिसोदिया आहेत हे सांगणाऱ्या मंडळींनी व ही मांडणी डोळे झाकून विश्वासार्ह मानून ही माहिती इतरत्र दाबोजोराने फिरवणारांनी उभ्या आयुष्यात कधीतरी हा मेवाडच्या दरबारी भाटांनी लिहिलेला मेवाडचा राजकुलाख्यान हा ग्रंथ वा दस्त हातात घ्यायचे तर सोडाच पण कधी त्याला प्रत्यक्ष पाहिले तरी आहे काय? या ग्रंथाचे लेखन नेमके कोणत्या काळात आरंभले व त्यात कोणत्या काळात मागाहून जोडलेली भाटकृत माहिती समाविष्ट करण्यात आली,हे त्यांना माहीत तरी आहे काय?या ग्रंथाचे अखेरचे संस्करण,तो लिहिणाऱ्या ‘अनेक भाटकवींची’ नावे व त्यात घातलेली भर याबाबत जिज्ञासूंनी उदयपूर येथून यथावकाश माहिती करून घ्यावी.भोसले कुळाच्या प्राचीनतेचा शोध घेताना ही भाटरचित माहिती अप्रस्तुत निराधार,अनैतिहासिक,तकलादू पुरावेशून्य,विपर्यस्त ठरते हे सुस्पष्ट आहे.या अतिप्रचंड उत्तर कालीन भाटांच्या वर्णनातून भोसलेंचे सिसोदिया असणे ही कपोलकल्पितता सत्य ठरत नाही.या अतिअतिअतिअतिउत्तरकालीन भाटकृत पोथी वरून सातवाहन या प्राचीन साम्राज्याच्या राजवट काळातील इतिहास लिहायला घेणे फक्त हास्यास्पदच आहे व इतिहास विषयाचे आब्रूहरण करण्यासारखे आहे याहून वेगळे काही नाही.सातवाहनांचे अनेक शिलालेख,स्तंभलेख भारतात इतरत्रही व महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील इतर राज्यांतही अवगत झाले आहेत,त्यांपैकी उपरोक्त प्रमाणे एकाही सातवाहन कालीन वा अगदी उत्तर सातवाहन कालीनही व गुप्तकालीनही शिलालेख

व अन्य स्तंभादी लेखात या तथाकथित स्थलांतर केलेल्या शिसोदेंच्या कुळनामातील ‘श’ चा सुद्धा उल्लेख ना गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकालीन शिलालेखात ना पुळुमावीकाळात ना राजस्थान वर राज्य असलेल्या गुप्तांच्या काळात!!! त्यांचे अस्तित्व प्रचलित आख्यायिकेनुसार प्राचीन काळी मुंगीपैठण येथे दाखवणारा शिलालेखीय,ताम्रपटीय,स्तंभलेखीय आदी प्राचीन पुरावा उपलब्धही नाही व अस्तित्वातही नाही!मग ही कपोलकल्पित मांडणी कशाच्या बळावर सत्य मांडली जात आहे जिला एका अक्षराचाही समकालीन पुरावा नाहीये.मी पुन्हा हा प्रश्न मांडतो की सातवाहनांच्या,गुप्तांच्या पतनानंतर सहस्त्राधिक वर्षांनी लिहीलेली दरबारी भाटांची अतिअतिअतिअतिउत्तरकालीन नोंद जी सत्याच्या व तथ्याच्या कोणत्याच कसोटीवर उतरत नाही अशा अतिउत्तरकालीन साधनास ग्राह्य धरून प्राचीन इतिहासाचे लेखन करायला घेणे म्हणजे स्वत:हुन स्वत:ची व इतरांची दिशाभूल करण्या सारखे आहे.ही मांडणी तकलादू आहे व बनावट आहे हेच यातून सिद्ध होते.कारण बाप्पा रावळाच्याही पूर्वी-८व्या शतकाच्या आदी चित्तोड भागात मानमोरी(मोरी-उत्तरकालीन मौर्यांचे वारसदार म्हटले गेलेले) यांचे राज्य होते,तत्पूर्वी तेथे गुप्तांचे राज्य होते-विशेषत: रामगुप्त व समुद्र गुप्त-इस ३३५ते इस३७५ व चंद्रगुप्त द्वितीय-इस-३७५ ते इस४१४..,[टीप:-बाप्पा रावळ यास काही अभ्यासकांनी भाटांच्या नोंदींना भाळून वलभीच्या मैत्रक घराण्याशी संबंधित दाखवून मैत्रक अर्थात मथुरेच्या यादवांचा वंशज म्हणून संबोधले आहे व खूपच मचळा निर्माण केला आहे,असे कआ झाले यावर जिज्ञासूंनी कसोशीने शोध घ्यावा!]

त्याच्याही पूर्वी त्या भूभागात २ऱ्या व ३ऱ्या शतकात मालव जनपदाचे गणराज्य होते जे गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकाळातही दिसतात,मालवांचे दक्षिण भारताशी असलेले तत्कालीन व्यापारी संबंध सिद्ध करणारे समकालीन सातवाहनकालीन पुरावे उपलब्ध आहेत,शिवाय सातवाहनांचे शत्रू असलेल्या शकांचेही राजस्थानातील काही भागावर राज्य होते जे २ऱ्या शतकात व ३ऱ्या शतकाच्या आरंभीचा काहीसा काळ असे अस्तित्वात होते,शकांचा तेथील अंमल साधारण इस१५० ते इस२०० असा होता.मालवांच्या तेथील लगतच्या भूभागावरील नागांसह असलेल्या संयुक्त प्रजातंत्री गणराज्याचे इस-२ऱ्या ते ३ऱ्या शतकातील व गुप्तकाळातील ‘पुरातत्वीय पुरावे’,नाणकशास्त्रीय इ.पुरावे अवगत झाले आहेत,त्यांची नगरे पूर्वी कशी व कोणत्या धाटणीची होती याचे उत्खननात सापडलेले पुरातत्वीय अवशेष मी पाहिले आहेत,किंबहुना याच्याही मागचा इतिहास उपलब्ध आहे,पण तो प्रस्तुत चर्चेत घेऊन मला नाहक हा लेख लांबवायचा नाहीये,उपरोल्लेखित विविध कालखंडांचा अस्सल ऐतिहासिक पुरावेधारित आढावा घेता तेथे झालेल्या ऐतिहासिक सत्ता संक्रमणाच्या संपूर्ण इतिहासात शिसोदे नामक एकाही तथाकथित मुंगीपैठण वरून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या रहिवासाचा समकालीन एकही पुरावा संपूर्ण राजस्थानसह मेवाडात,चित्तोडात,महाराष्ट्रात कोठेही उपलब्ध नाही व अस्तित्वातच नाही आणि या पुरावेच नसलेल्या मांडणीला सातवाहन व सातवाहनोत्तर काळात ‘घुसवले’ जाते आहे,तेही कुणाच्या मांडणीवरून…तर दरबारी भाटकवींच्या,ज्यांचे सातवाहन व सातवाहनोत्तर काळाकडे निर्देश करणारे तथाकथित भाष्य इतिहासलेखनशास्त्रानुसार निरूपयोगी ठरते-निरूपयोगी ठरते-आणि निरूपयोगीच ठरते…..ते प्राचीन काळाचा इतिहास लिहीताना कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य मानलेच जाऊ शकत नाही-नाही-नाही.ही केवळ इतिहासाची थट्टा व त्यासह केलेली विपर्यस्त छेडछाड मात्र आहे.

शिवाय रा.अ.कदम यांच्या पूर्वोक्त ग्रंथातील याच पृष्ठ-३६वर ग्रंथकर्त्याच्या नोंदीत सातवाहनांच्या लगतच्या काळात ज्या घराण्यांचे दक्षिण भारतात आगमन झाल्याचे म्हटले आहे त्यात चेर व चोळ/चोल(भोसले घराण्याचे नातेवाईक) यांचाही उल्लेख केला आहे.चेर व चोळ यांबाबतची ही मांडणी मी-मयूर चव्हाण,’पूर्णपणे अमान्य’ करत आहे कारण ही मांडणीच अनैतिहासिक आहे.माझ्या वाचनात आलेल्या मौर्यकालीन शिलालेखांनुसार ‘सम्राट अशोक मौर्य-मोरे’ याच्या समकालीन शिलालेखात चेरल वा चेरला,चोड-चोळ यांचा अनुक्रमे केरळ व तामिळ देशांतील रहिवासी म्हणून उल्लेख आला आहे,आजचे केरळ हे नाव बनलेच आहे मूळात तेथील प्राचीन चेर या रट्टांमुळे-चेरल हेच आधुनिक केरल/केरळ होय,तर तामिळभूमीचा प्रदेश हा उपरोक्त प्रमाणे चोलांचा म्हणून मौर्य काळापासून ओळखला जातो(प्रस्तुत लेखाचा विषय वेगळा असल्याने विषयांतर होऊ नये म्हणून मी सध्या इतकेच नोंदवत आहे,या विषयावर मी पुढे वेळपरत्वे स्वतंत्र विस्ताराने लिहीन).तेव्हा कोणत्याही अभ्यासकाची मांडणी स्विकारत असताना स्वतः ती सत्य व तथ्याच्या कसोटीवर पारखून घेतल्याशिवाय त्या आधारावरच आपले मत मांडणे घाईचे व ऐतिहासिक तथ्यांपासून स्वत:ला व इतरांनाही परावृत्त करण्यासारखे आहे,इतिहासाचा विपर्यास करणारे आहे हे खात्रीशीर.

आणखी एक पान पुरावा म्हणून फिरवले जाते ते म्हणजे मुंहता नैणसी(इ.स१६१० ते इस१६७०) या उत्तरकालीन भाटकवीच्या ‘मुंहता नैणसी री ख्यात’ या ‘अनुवादित प्रतीच्या खंडाचे’,जिला अगदी राजस्थानचेच इतिहासकार पृथ्वीराजरासो या अतिउत्तरकालीन साधनाच्या धाटणीत बसवून इतिहासलेखनशास्त्र नियमानुसार व नैनसीच्या लेखनाच्या समकालीन इतर संदर्भांस ताडून पाहता दुय्यम दर्जाचे मानतात कारण यातही बऱ्याच अतिरंजित व ऐतिहासिक तथ्यांशी दुरान्वयानेही संबंधित नसल्याने काही सबबी आलेल्या आहेत व काही ठिकाणी तर न घडलेल्या घटनांचे अगदी अनाठायी काल्पनिक लेखन,पसरून करण्यात आले आहे.अगदी राजस्थानच्या इतिहासावर दिर्घलेखन करणारे जीएस.ओझा,डी.शर्मा,रघुनाथसिंह,एल.बी.देसाई,

बी.एन.दिवाकर,कालीपहाडी,गुर्जर,आर.बी.सिंघ,बी.राणा,डी.निर्वाण,डी.सी.शुक्ला,डी.सरकार इ.

इतर अनेक ज्येष्ठ इतिहास संशोधकांचे मत असेच आहे.तेव्हा मुहणोत नैनसी याच्या मांडणीचा आधार देऊन भोसलेंना सिसोदिया दाखवणारांनीही मुहणोत या भाटकवीच्या मते शिसोदेंच्या तथाकथित स्थलांतरणाचा काळ सातवाहन वा सातवाहनोत्तर काळात निराधारपणे घुसवून त्यांचे दक्षिणेतून उत्तरेत गेल्याच्या तकलादू मांडणीला कोणत्याही प्राचीन समकालीन पुराव्याचा आधार नाही हे सुस्पष्टच असल्याचे कायमस्वरूपी ध्यानात घ्यावे व हा अनैतिहासिक अपप्रचार थांबवावा.जर याच पद्धतीने अतिउत्तरकाळातील व सातवाहनांसारख्या व पुढील काळातील प्राचीन सम्राटांच्या काळी व्यवहारात असलेल्या प्राचीन भाषा व लिपींचा गंधही नसलेल्या दरबारी भाटकवी व लेखनीसांच्या नोंदीना समकालीन तथ्यांची व पुराव्यांची जोड आहे की नाही हेही न पाहता जणू ती मांडणी म्हणजे अंतिम सत्यच मानून संशोधन करायचे असेल,तर भविष्यपुराण या अनेक प्रक्षेपांनी युक्त अशा पुराणात घालण्यात आलेल्या शिवरायांच्या अतिउत्तरकाळातील त्यांच्या जन्म व अस्तित्वाबाबतच्या प्रक्षिप्त नोंदी सत्य मानल्यासारखेच हेही आहे,याहून वेगळे काही नाही.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे शाहजीमहाराज यांचे अनेक दरबारी कवी व पुढे राजाराम महाराज यांच्या काळापर्यंतचे दरबारी कवी त्यांचा उल्लेख शिसोदे असे करतात म्हणून त्यांचा संबंध तात्काळ उत्तरेतील सिसोदियांशी सिद्ध होऊ शकत नाही! यावर कोणी युक्तिवाद करेल की मग काय छत्रपतींच्या दरबारातील कवींनी मांडलेली वर्णने छत्रपतींना ज्ञात नव्हती काय?त्यांची त्यांस अनुमती नव्हती काय?त्यांना त्यांचे पूर्वज कोण होते हे ज्ञात नव्हते काय?असे अनेक प्रश्न निश्चित उपस्थित होतात व आपण त्यावर पुढे चर्चा याच सदरात करणारच आहोत जी होणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे,पण कवींच्या या नोंदींना तथ्यांची व वास्तवतेची जोड कितपत आहे यावर अभासात्मक भाष्य करणाऱ्या अभ्यासकांवर जणू ते छत्रपतींनाच खोटे ठरवत आहेत वगैरे शब्दच्छल करून मूळच्या प्रश्नांना सोयीस्करपणे गुंगारा हाणता येणार नाही व ते वाटते तितके सोप्पेही नाही व अशातून आपणास सहानुभूती मिळेल अशी भाबडी अपेक्षाही कुणी ठेवू नये व तसा अपप्रचार करू नये.उपरोक्त सर्वच कवींच्या मांडणीला दस्तुरखुद्द छत्रपतींच्या स्वमुखातून दुजोरा देण्यात आलेले एक तरी साधन उपलब्ध आहे काय?जसे की मागच्या लेखातही स्पष्ट विचारणा आपण केली आहे तिला सोयीस्करपणे गुंगारा देण्यात अर्थ नाही.अगदी शाहजीमहाराज,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज,छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या एकाही ‘स्वलिखित,स्व-राजमुद्रीत,स्वलेखनात’ कोठेही ‘आम्ही उत्तरेतून दक्षिणेत आलेल्या सज्जनसिंह,भोसाजी या सिसोदियांचे वंशज आहोत,आम्ही मूळचे येथील नसून राजस्थानवरून आलेलो आहोत,आमचे पूर्वज मराठा नसून ते राजपूत असून सिसोदिया शाखेतील भोसाजीपासून भोसले म्हणून आम्ही ओळखले जाऊ लागलो,आमचे मूळ कुलनाम भोसले नसून सिसोदिया वा शिसोदे आहे’ इ.अशा प्रकारचे उपरोक्त भोसलेराजेंच्या लिखित समकालीन साधनाच्या एका चिटोरीवर तरी उल्लेख आहे काय? दरबारी कवींच्या म्हणण्याला उपरोक्त भोसलेराजेंच्या स्वलिखित एखाद्या साधनात दुजोरा देणारे वर्णन कोठेही उपलब्धच नाही आणि म्हणून उपरोक्त प्रश्न अत्यंत गंभीर व महत्वाचे ठरतात जे की सोयीस्करपणे निरूत्तरित ठेवून चालणार नाही.या कवींच्या वर्णनांना आधार मानून शाहजीमहाराज ते छत्रपती थोरले शाहू महाराज यांपैकी एकाही राजेंनी आपले भोसले हे कुळनाम बदलून सिसोदिया केलेले नाही हेही मुद्दाम ध्यानात घ्यावे,हे वास्तव इतक्या सहजतेने व सोयीस्करपणे नाकारून चालणार नाही! शाहजीमहाराजांनी त्यांच्या हयातीत शोधलेली सिसोदिया भोसले संबंध सांगणारी वंशवेल उपलब्ध आहे काय?

यात आणखी भर पडते ती मालोजीराजे व अगदी बाबाजी यांची.त्यांनीही आपण सज्जनसिंह,भोसाजी या स्थलांतरितांचे वंशज असून सिसोदिया असल्याचे स्वकुळावरील त्यांची लिखित धारणा अस्तित्वातच नाही,मालोजीराजे हे स्वकर्तृत्वाने झळाळलेले कसलेले सेनानी आपण भोसाजीपासून भोसले झालेले सिसोदिया आहोत वगैरे असे कोठेही नोंदवत नाहीत व आपले आडनाव बदलून सिसोदिया करीत नाहीत.ज्या सज्जनसिंह,भोसाजी,दिलीपसिंह,उग्रसेन,सिंधोजी वगैरे पलायन करून दक्षिणेत आलेल्या वा स्थलांतरितांची नावे शिवरायांचे पूर्वज म्हणून शके१७४४-इस१८२२दरम्यान शाहजीराजे,शिवराय,शंभूराजे,राजाराममहाराज,थोरलेशाहूछत्रपती,छत्रपती ताराराणी यांच्या नंतरच्या अतिउत्तरकालात बनविण्यात आलेल्या वंशावळीत दाखवली जातात त्यांचे महाराष्ट्रासह समस्त दक्षिण भारतातील अस्तित्व दाखवणारी समकालीन साधी एक चिटोरी सुद्धा अस्तित्वात नाही,यातूनच या सज्जन भोसाजी व इतरांचे दखनेतील स्थलांतर व येथील रहिवास हे काल्पनिक असल्याचे स्पष्टच दिसते.एखादा व्यक्ती एका विशिष्ट प्रदेशात एका विशिष्ट काळात रहिवास करित होता हे दर्शविणारा कोणताही पुरावा अस्तित्वातच नसल्यास त्याचा तेथील रहिवास व त्या व्यक्तीचे अस्तित्व काल्पनिकच ठरते,कारण “””””””No documents No history हा इतिहासाचा नियमच आहे”””””””,त्यासाठी शाहजीमहाराजांच्या दक्षिणेत केलेल्या राज्यस्थापनेच्या जाज्वल्य इतिहासास पुढे करून झाकून नेण्याचा शब्दच्छल करण्याची गरज नाही व त्यातून काही सिद्धही होत नाही हे कळण्याइतकी सदसद्विवेकबुद्धी महाराष्ट्रीयन वाचक,अभ्यासकांना नक्कीच आहे,तेव्हा अशा निव्वळ काल्पनिक मांडणीला शाहजीराजेकालीन दक्षिणेतील घटनांचे दाखले देत उपरोक्त काल्पनिक स्थलांतरे ही निव्वळ योगायोग असल्याचे दाखवून काही सिद्ध होत नसतंय.

राहता राहिला कवी भूषण व त्याची राज्याभिषेक पूर्व शिसोदे असल्याचे कवित्व,तर यावर भगवानदासजी तिवारी यांनी १९७२मध्येच रियासतकारांची मांडणी व भूषणाचे भोसले कुळास शिसोदे सांगणारे ‘कवित्व’ यावर रियासतकारांचीच नोंद दिली आहे की भूषणाचे हे कवित्व शिवरायांस सिसोदिया साबित करू शकत नाही कारण त्यांचे ‘भोसले’ हे आडनाव त्यास मुख्य अडसर ठरते कारण भोसले हे ‘स्वतंत्र कुलनाम’ दिसते हे रियासतकारांचेही मत होतेच जे की तिवारींनीही भूषणाच्या साधनांवर भाष्य करताना दुजोरीले,नोंदवीले आहे.शिवाय हाच भूषण महाराजांना यदुवंशी संबोधतो हे विसरून चालणार नाही,तो रामांची उपमाही देतो.भूषणाने अशी अनेक विशेषणे शिवरायांना दिलेली आहेत ती ऐतिहासिक तथ्ये ठरू शकत नाहीत.विशेषणे कोणती,उपमा कोणत्या,संबोधणे कोणती हे फरक स्पष्ट करून घ्यावेत.शिवाय आणखी काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

शाहजीमहाराज ते राजाराम महाराज या काळात होऊन गेलेल्या कवींच्या कवित्वात सिसोदिया सज्जन ते भोसाजी व पुढील व्यक्ती(काल्पनिक) यांच्या तथाकथित स्थलांतरणाचा काळ नमूद आहे काय? या व्यक्तींची दक्षिणेतील रहिवासी स्थाने दरबारी कवींनी नोंदवली आहेत काय? या तथाकथित स्थलांतरितांच्या कुटुंबांची इत्यंभूत माहिती कवींनी नोंदवली आहे काय? त्यांचे भोसाजी यापासून भोसले आडनाव बनवण्यावर कोठे भाष्य आहे काय व भोसाजीवरून भोसले झाल्याचा निश्चित कालखंड या सर्व कवींनी नोंदविला आहे काय?भोसले कुळाची इत्यंभूत अशी परिपूर्ण वंशावळ या कवींनी दिलेली आहे काय? दिली असल्यास ती कोणत्या पुरूष व स्त्री पासून आरंभते व त्यांच्या अस्तित्वाचा समकालीन ऐतिहासिक पुरावा या सर्व कवींनी दिलेला आहे काय?बाळाजीने आणलेली वंशावळ व प्रतापसिंह छत्रपती यांच्या काळातील बनविलेल्या तथाकथित सिसोदिया वंशावळीशी साम्य सांगणाऱ्या वंशावळीचा उल्लेख या सर्व कवींनी केला आहे काय?या व अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच मिळतात.समकालीन कवींच्या भोसलेंस केलेल्या शिसोदे निर्देशनावरून भोसले कुळाचा १४व्या शतकापासूनच्या तथाकथित स्थलांतरित होण्याचा तथाकथित इतिहासही कोणत्याही कवीने सांगितलेला नाही हीच सर्वात मोठी विसंगती आहे आणि ती लक्षात न घेता केवळ समकालीन साधने म्हणून भोसलेंस सिसोदिया सांगणारी म्हणून वारंवार पुढे करण्यात अर्थ नाही,कारण तिच्या कर्त्यांना भोसले हे सिसोदिया(?) कधी झाले हेच सांगता आलेले नाही,तेव्हा कवींचे भोसले कुळास शिसोदे सांगणारे कवित्व डोळे झाकून स्विकारणे सत्यास व तथ्यास धरून नाही.हे कवी शाहजीमहाराज ते शिवराय,शंभूराजे,राजाराम महाराज यांच्या काळात होऊन गेले(वा.सी.बेंद्रे यांनी मालोजीराजे व शाहजीमहाराज या ग्रंथात शाहजीकालीन व शिवकालीन या काळातील,शाहजीमहाराजांच्या दरबीरीयांची व दरबारी कवींची,पंडितांची यादीच दिली आहे ती पहावी),जेकी पेशाने कवी होते,यांचा शाहजीमहाराज (व अगदीच कोणी रेटून म्हणेल की मालोजीराजे यांच्या काळापासून) यांच्या काळापासून भोसले परिवाराशी संबंध आलेला होता.याचाच अर्थ या कवींना ते भोसले घराण्याच्या दरबारी नोकरीस येण्यापूर्वी भोसलेंची प्राचीन पार्श्वभूमी माहित असण्याचा संबंध येत नाही आणि म्हणूनच शिसोदे असण्याची कवींची मांडणी ग्राह्य धरता येत नाही.शिवाय भूषण वगळता एका विशिष्ट काळापासून पुढे हे कवी भोसलेंना सिसोदियांशी जोडताना दिसतात हे मुद्दाम लक्षात घ्यावे.भूषणलिखित साधनातील शिसोदे असण्याच्या दावा सुद्धा चिकित्सेअंती फोल ठरतो हे आपण वर पाहिले.या कवींची साधने शाहजीराजेकालीन,शिवकालीन,शंभूकालीन,राजारामकालीन इ. इतिहास अभ्यासण्यास जरूर-जरूर उपयुक्त आहेत,परंतु भोसले परिवाराची ‘प्राचीन’ पार्श्वभूमी मात्र या ‘मध्ययुगीन’ साधनांतून प्राप्त होत नाही व कवींच्या निव्वळ शिसोदे संबोधनातून कोणत्याही आधार नसलेल्या त्यांच्या या मांडणीतून भोसले कुळ सिसोदिया ठरत नाही.प्राचीन इतिहास हा प्राचीन साधनांतूनच शोधला जाऊ शकतो ना की मध्ययुगीन वा आधुनिक काळातील साधनांतून!!

राज्याभिषेकापूर्वी शिवरायांनी बाळाजी आवजीस उदेपूरास धाडून वंशावळ करवीयली म्हणून त्या मागचे ‘समाजशास्त्रीय’ कारण व पारिस्थितीक विसंगतींची चिकित्सा न करता भोसलेंस सिसोदिया म्हणून घाईघाईने दाखवणारांनी पुढील तथ्यात्मक सवालांवर जरूर विचार करावाच.शिवरायांना त्यांचे मूळ उदयपूरच्या सिसोदियांत आहे हे कळाले होते हे ‘तात्पुरते’ मान्य करू(तात्पुरतेच बरं का!).मग महाराजांना हेही जरूर कळाले असणार की आपला परिवार भोसाजी या पुरूषापासून भोसले-भोसावत संबोधला गेला असून भोसले हे आपल्या परिवाराचे मूळ आडनाव वा कुलनाम अजिबात नसून सिसोदिया-शिसोदे हे आपले मूळ कुलनाम आहे वगैरे!कारण भोसलेंना सिसोदियांशी जोडणाऱ्या तथाकथित वंशावळीत भोसाजीचे नाव आहे हे तुम्ही आम्ही वारंवार पाहत आलो आहोत.मग अशा वेळी अजरख्तखान्यातून पत्रलेखन समक्ष करणारे वा लेखनीसांकडून करविणारे शिवराय राज्याभिषेकानंतर आपली अन्य एक राजमुद्रा रूढ करतात,बिरुदावली स्वतंत्र धारण करतात,राजचिन्हे,राजाभूषणे आदी त्यांची सगळी छत्रपती पदाचे राजत्व दर्शविणारी प्रतीके आपणास ज्ञात आहेत.असे असताना मात्र उदेपूराहून आणलेल्या सिसोदिया वंशावळी नुसार महाराजांनी भोसले हे आडनाव बदलून सिसोदिया हे मूळ(?)आडनाव राज्याभिषेका प्रसंगी अधिकृतरीत्या धारण का केले नाही? जेव्हा की महापंडित गागाभट्ट यांच्याकरवी महाराजांना स्वत:स सिसोदिया म्हणून जाहीर करण्यात कोणतीच अडचण अजिबातच नव्हती,उलट एकट्या भोसाजीच्या नावे आपले कुळनाम लावण्याच्या ऐवजी मूळचे सिसोदिया वा शिसोदे हेच कुळनाम म्हणून महाराजांनी स्वतंत्रपणे का स्विकारले नाही बरे? उत्तर स्पष्ट आहे व तेच आहे जे हा लेख वाचणाऱ्या तुम्हा वाचकांचे मन तुम्हाला या क्षणी सांगत आहे व यालाच राजवाडे आदींनी ‘चिटणीसी गौडबंगाल’ म्हटले आहे हे सत्यास धरूनच आहे,जे केवळ तात्पुरत्या सोयीसाठी करण्यात आले होते हे मत पूर्वीच्या ज्येष्ठ संशोधकांनी इतरत्र मांडलेच आहे ज्यावर मी पुनरुक्ती करत बसणार नाही.

केवळ शिवरायच नव्हे तर पुढील चक्क एकाही छत्रपतींनी आपले ‘भोसले हे आडनाव बदलून’ सिसोदिया लावलेले नाही,अर्थात ‘भोसले हे मूळ कुळनाम’ त्यांनी सोडलेले नाही हे मुद्दाम लक्षात घ्यावे.शिवरायांच्या नावे वर्षानुवर्षे खपविण्यात आलेल्या सिसोदियाकरणास दुजोरा देणाऱ्या आमच्या महाराष्ट्रीयनांनी या गंभीर प्रश्नांवर जरूर विचार करावा.हे गंभीर प्रश्न आमच्या मागील पिढ्यांना पडले असते तर आमच्या राष्ट्रनायक कालजयी लोकराजाचे कुळ आम्हाला दूरदेशी अनाठायी शोधत जावे लागले नसते.

महत्त्वाचे म्हणजे सिसोदिया हा कायमस्वरूपी सूर्यवंश राहिला आहे व म्हणूनच सूर्यवंशी भोसलेही सिसोदिया सूर्यवंशी आहेत ही बनावट वंशावळीवर आधारित मांडणी तकलादू ठरते कारण हमीर या आद्य सिसोदिया म्हटला गेलेल्याच्या मरणानंतर इस१३६४ नंतर त्याच्या पुढील विविध शाखेतील वंशजांनी त्याच्या मृत्यूस दोन अडीच शतके पूर्ण व्हायच्या आतच स्वत:ची गोत्रे व वंश बदलल्याचे दिसते,राजस्थानातीलच एका सिसोदिया शाखेने हमीरच्या मरणानंतर अडीचशे वर्षातच १६व्या शतकाच्या पडावात १७व्या शतकाच्या आरंभी आपले गोत्र बदलले होते,तर काही सिसोदिया ओसवाल मध्ये convert झाले होते व चंद्रवंशाचे दावे करत होते,तेव्हा एकच एक अशी वंशधारणा सिसोदियांच्या विविध शाखांत दिसत नाही व त्यावरून सूर्यवंशी म्हणण्यात आलेले भोसले घराणे हे सूर्यवंशी सिद्धांतानुसार सिसोदिया अजिबातच ठरत नाहीत,तेव्हा सूर्यवंश सिद्धांत मांडुन सिसोदियांशी भोसलेंचा संबंध जोडणे अनैतिहासिक आहे,बाकी वंश व गोत्रे ही काळोकाळी कशी बदलतात यासाठी प्राचीन इतिहासाचा अभ्यास जिज्ञासूंनी जरूर करावा! शिवाय मी हेही येथे नमूद करू इच्छितो की गुहिलोतांची सिसोदियांची पौराणिक म्हणून सांगण्यात आलेली वंशावळ ही बनावट असून भवानीसिंग राणांनी ती अमान्य करून ती भागवतातील वंशवेल बनावट असल्याचे दाखविले आहे हे आवर्जून ध्यानात घ्यावे!

आणखी एक मुद्दा-सज्जनसिंहाची दक्षिणेत पलायन करून स्थलांतरित होण्याची घटना काल्पनिक आहेच पण त्यात तरी कोठे एकवाक्यता आहे,सज्जन दखनेत येण्याचा व त्याचा येथील अस्तित्व दाखविणारा पुरावाच अस्तित्वात नसल्याने त्याचा इकडे येण्याचा काल्पनिक काळही इस१३०० दरम्यान,इस१३२०, इस१३३०,इस १३३४ असा अत्यंत विसंगत सांगितला गेला आहे जो इतिहास लेखन शास्त्रास अजिबातच धरून नाही.आता कळीचा मुद्दा हा की उपरोक्त काळात चालू असलेल्या राजकीय संघर्षात सिसोदिया परिवाराच्या वंशजाची,त्याच्या समकाळात उत्तरेत व दक्षिणेत ज्या सत्ता अस्तित्वात होत्या त्यापैकी खिलजी व पुढील तुघलक,तर दक्षिणेतील प्रामुख्याने विजयनगरचे शासक यांच्या समकालीन एका साध्या चिटोरीवरही या स्थलांतरित सिसोदिया वंशजाचा उल्लेख नाही जेव्हा की सिसोदिया परिवार तेव्हाच्या राजकीय संघर्षातील एक घटक बनला होता.आता हा पलायन करून आलेला वा स्थलांतरित जो चितोडाहून निघाला तो अधीमधी कोठेही न थांबता थेट येऊन महाराष्ट्राचा रहिवासी झालाही व इथल्या संस्कृतीत तात्काळ मिसळून जाऊन आपल्या मूळभूमीस क्षणात विसरून जाऊन इथलाच रहिवासी झालाही,त्याच्या परिवाराकडे कधीही परत न जाता व ते मेले आहेत की जिवंत आहेत हेही न पाहता….वारे पठ्ठया सज्जना!तुझ्यासारखे काल्पनिक स्थलांतरित परंतु विविधतेत एकता जपणारे भारतात या युगी सातत्याने जन्मो बरे!मग भले तुझा येथील रहिवास काल्पनिक असो,सांस्कृतिक बदल एवढ्या झपाट्याने स्वीकारणारा हा पठ्ठया तत्कालीन भारतातला एकमेव बरं का..काय योगायोग आहेना?

दुसरा एक अतिमहत्त्वाचा मुद्दा,उदयपूर येथे असलेल्या सिसोदियांच्या ‘अधिकृत’ वंशावळीत या सज्जनाच्या पुढील भोसाजी,दिलीप,शुभकृष्ण,सिंधोजी वगैरे तथाकथित सिसोद्यांची एका अक्षरानेही नोंद केलेली नाही,ती का केलेली नाही यावर मात्र जिज्ञासूंनी मुद्दाम शोध घ्यावाच!सिसोदियांवर संशोधन करणाऱ्या एकाही संशोधकाला उपरोक्त सज्जन,भोसाजी या तथाकथित स्थलांतरित सिसोदियांचे दक्षिणेतील अस्तित्व आजतागायत सिद्ध करताच आले नाही हे भारतात आजपर्यंत झालेल्या सिसोदियांवरील शोधग्रंथ वाचणारांना कळून जाईल.

प्रतापसिंह या सातारकर छत्रपतींच्या राजकन्येचा विवाह जमविताना राजपुतान्यातील एखाद्या घराण्यातील वर शोधावा या इच्छेने प्रतापसिंह छत्रपतींनी पराकोटीचे प्रयत्न केले,लग्न जमविण्यास छत्रपतींचे संयोजक राजपुतान्यास गेले असे आपण जाणतो,या प्रयत्नात त्यांचे तथाकथित भाऊबंद सिसोदिया यांचा कोणत्याही प्रकारचा सौहार्द सहभाग दर्शविणारे दस्तऐवज अस्तित्वात आहेत काय?राजपुतान्यातील एखाद्या घराण्याशी वैवाहिक संबंध जोडण्याचा प्रचंड प्रयत्न करूनही प्रतापसिंह छत्रपतींना कुणीही राजपूत रियासतीने प्रतिसाद दिला नाही,अखेर आपल्या राजकन्येचा विवाह महाराष्ट्रातीलच मराठा घराण्यात त्यांनी लावून दिला,”यातून बऱ्याच सबबी स्पष्ट होतात” ज्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करून चालणार नाही व यावर सातत्याने चिंतन-मनन वाचकांनी करायलाच हवे.राजपुतान्यातील एकाही रियासतीने “दस्तुरखुद्द प्रतापसिंह छत्रपती” यांच्या राजकन्येच्या विवाह प्रस्तावास प्रतिक्रिया दिली नाही हाही योगायोगच म्हणावा काय?भोसलेंचे तथाकथित भाऊबंद सिसोदिया हे यावेळी कोणती भूमिका बाळगून होते?आणखी एक अत्यंत गंभीर मुद्दा ज्यापासून कुणी कितीही पळ काढला तरी हा प्रश्न आ वासून उभा आहे जो सोयीस्करपणे टाळला जातो व त्या प्रश्नास सिसोदिया सिद्धांत मांडणारी मंडळी गुंगारा मारताना दिसते तो असा की:-

ठीक आहे चर्चेसाठी म्हणून तात्पुरते हे मान्य करू की(तात्पुरतेच बरं का), छत्रपतींचे भोसले घराणे हे राजस्थान वरून स्थलांतरित झालेल्या सिसोदियांचे वारस आहे आणि ते भोसाजीच्या नावे भोसले झाले आहे इत्यादी इत्यादी.. परंतु! ज्या भोसले या महाराष्ट्रातील इतर मराठ्यांचा,छत्रपती घराण्याच्या कोणत्याही वंशावळीत दुरान्वयानेही संबंध येत नाही ते छत्रपतीभोसले घराण्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर मराठा भोसले हे कुणाचे वंशज आहेत? का हे भोसलेही,ज्यांची संख्या आज लाखोंच्या घरात जाते,तेही स्थलांतरित तथाकथित भोसाजीचेच वंशज आहेत काय?भोसाजी वरून भोसले झालेले आहेत काय?

आता सिसोदिया(?)भोसलेंच्या महाराष्ट्रातील वंशजशाखा म्हणजे सातारा,करवीर,नागपूर,अ.नगर,जिंती व महाराष्ट्राबाहेरील तंजावर अशा काही निवडकच शाखा असल्याचे मानले जाते व भोसल्यांची म्हणून सांगितल्या गेलेल्या गावांची एक यादीही दाखवली जाते.परंतु या व्यतिरिक्त (म्हणजे छत्रपती घराण्याच्या वंशावळीत नसलेल्या) महाराष्ट्रात भोसले बहुल अक्षरशः गावेच्या गावेच दिसतात,इतकेच कशाला,महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे जेथे भोसले आडनावाचे मराठे राहत नाहीत हे सिद्ध करून दाखवा बघू सिसोदियावादींनी.अहो इतकेच काय,मागे झालेल्या २०११च्या दशवार्षीक जणगणनेचा गावोगावचा घराघराचा अहवाल जाऊन वाचा,मग आपणास कळून जाईल की एकट्या महाराष्ट्रात भोसले आडनावाच्या मराठ्यांची लोकसंख्या आज लाखाच्या घरात गेली आहे.अशा वेळी व्यक्तीगत छत्रपतींच्या भोसले घराण्याच्या वर्तमान विविध वंशजांच्या कुटुंबांची व व्यक्तींची संख्या व छत्रपत्येतर मराठा भोसले कुटुंबाची व व्यक्तींची संख्या यांचे वर्गीकरण केल्यास छत्रपत्येतर मराठा भोसले यांची तादात अधिक ठरते,मग हे सारेच भोसले जे वैयक्तिक छत्रपती घराण्याच्या वंशावळीत उल्लेखित नाहीत व छत्रपतींशी कोणत्याही प्रकार संबंधित नाहीत या मान्यतेनुसार मग हे सारेच भोसले काय त्या १४व्या शतकात कपोलकल्पितरित्या स्थलांतरित झाला म्हणून सांगितल्या गेलेल्या सज्जनाचा वारस भोसाजीचे हे इतके सारे वंशज आहेत काय? जर या सर्व भोसलेंना ‘एकट्या भोसाजीचेच वंशज व भोसाजीवरून भोसले झालेले’,असे एका क्षणासाठी जरी मानले तर किती उघड उघड ही भोसलेंची लोकसंख्या, लोकसंख्याशास्त्राला आव्हान देते आहे हे आता ‘सूज्ञ’ वाचकांनीच ठरवावे!

सगळे भोसले एकट्या भोसाजीचेच वंशज मानले तर हे विधान म्हणजे मानवशास्त्राला व समाजशास्त्राला वाकुल्या दाखवल्या सारखेच आहे!

हे झाले महाराष्ट्राचे,पण या व्यतिरिक्त कर्नाटक,तेलंगणा इ.मध्ये रहिवासास असलेल्या भोसलेंचे काय? तेही भोसाजीचेच वंशज का? ते सोडाच,महाराष्ट्राबाहेरही भोसले आडनावाचे मराठे आहेत हे तरी माहिती आहे का भोसलेंना सिसोदिया वंशज म्हणणारांना?

तेव्हा भोसले कुळातील राजेंनी आपले पूर्वज होयसळ असल्याचे म्हटले नाही असे म्हणून भोसलेंचे शिलालेखीय बळकट पुराव्यांचा आधारे सिद्ध होत असलेले होयसळत्व नाकारणारांनी मग मालोजीराजे ते थोरले शाहू राजे यांनी कोठेही उल्लेखित न केलेल्या सज्जन,भोसाजी वगैरे पलायन करून आलेल्या वा स्थलांतरितांचे वंशज म्हणून भोसलेंना दाखविण्याची आता कालबाह्य झालेली निराधार मांडणी करू नये.'”””भोसळा'”” हा वेरूळचा शिलालेख व तत्पूर्व होयसळवंशज इस१४७० मधील विजयनगरकालीन अस्सल “””‘भोसळा'”” असाच शिलालेखीय उल्लेख, वेरूळ शिलालेखातील “””भोसळा””” या कुळनामाशी निसंदेह एकत्वच दर्शविणारा अस्सल पुरावा नामसाधर्म्य सिद्धांत पुढे करून नाकारणारे एक प्रकारे हेच कबूल करित आहेत की भोसले व भोसळा ह्या कुळनामात ‘साधर्म्य’ आहे,म्हणजेच सिसोदियांच्या दक्षिणेतील तथाकथित स्थलांतरणा पूर्वी भोसळा हे कुलनाम अस्तित्वात होते हे ते मान्य करीत आहेत,म्हणजेच होयसळा/होसळा/होसला/बोसळा/भोसळा/भोसला ही नामोत्पत्तीच ते जाहीरपणे मान्य करीत आहेत हे मुद्दाम लक्षात घेण्याजोगे आहे व या स्विकारार्हतेचे सदैव स्वागतच आहे….आणि म्हणूनच तर मग होयसळ/होसळा/बोसळा/भोसळा/होसला/होसले/भोसला(शाहजीराजेकालीन)/भोसले हे निसंदेह होयसळवंशजच ठरतात!

तेव्हा नर्मदा पार झेप मारणाऱ्या दक्षिणेतील होयसळ सम्राटांचे व सुदूर दक्षिण,पूर्व भारतासह श्रीलंका,थायलंड,व्हिएतनाम इ. व्यापक भूभागावर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या महारट्ट शासक चोल/चोळ या इतिहासकर्त्या महाबली साम्राज्याचे शासन आपल्या समर्थ बाहुबलावर तोलून धरणारे,विजयनगर साम्राज्याचे सेनानीत्व १५व्या शतकात गाजवणारे भोसळाराजेंच्या इतिहासाचे दाखले सिसोद्यांच्या तथाकथित कपोलकल्पित स्थलांतरापूर्वीच शिलालेखादी अस्सल ऐतिहासिक साधनांतून ठळकपणे दक्षिण भारतात दिसतात.तेव्हा भोसलेंना सिसोदिया दाखवणे म्हणजे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारणे व त्यांच्या स्वतंत्र इतिहासास सिसोदियांच्या इतिहासात भेळमिसळून टाकण्यासारखे आहे जे की अनैतिहासीकच व कपोलकल्पितच आहे,ते कसे हे या सदरात आपण शब्दोशब्दी साधार पाहिलेच आहे…तेव्हा भोसले हे दुरान्वयानेही सिसोदिया कदापि नाहीत,नाहीत,नाहीत, ते होयसळवंशजच आहेत हे सिद्ध होत असून सिसोदिया थिअरी आता कालबाह्य झाली आहे.

-मयूर चव्हाण

Scroll to Top