जगाचा पोशिंदा “बळीराजा” मरणाच्या वाटेवर!

जगाचा पोशिंदा “बळीराजा” मरणाच्या वाटेवर!

निर्लज्ज सरकारचे दुर्लक्ष!

महेंद्र कुंभारे,

           मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा याची नितांत गरज आहे. आदी मानवाच्या काळात वस्त्र ही संकल्पनाच नव्हती. आणि निवाऱ्यासाठी झाड अथवा डोंगर कपारीत, गुहेत बस्तान मांडले जायचे. आणि अन्न म्हणून झाडावरची फळे, कंदमुळे यावर मानव आपली गुजरान करत असे. मात्र, नंतर "गरज ही शोधाची जननी आहे" असे म्हटले जाते त्या गरजेनुसार जादा अन्नाची गरज भासल्याने मानव शेतीकडे वळाला. आज जगाची भूक हा बळीराजा पूर्ण करीत आहे. जगातील प्रत्येकाला संप करून आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा अधिकार आहे. मात्र, हाच बळीराजा कधी संपावर गेला, तर तुमचा पैसा, ऐशोआरामाची जिंदगी कवडीमोल ठरु शकते. तरीही या बळीराजाकडे निर्लज्ज सरकार दुर्लक्ष करते हे दुर्दैव आहे. शेतमालाचे भाव, मजुरी यात झालेली वाढ, पिकवलेला कांदा, कपाशी, सोयाबिन वगैरे वगैरे मालाची बाजारात घसरण, ४/६ महिने अहोरात्र मेहनत घेऊन पिकविलेली शेती आडत्यांकडे कवडीमोल भावात विकताना शतक-याच्या डोळ्यांत अश्रू नव्हे तर रक्तच येते. सरकारचे शेतीविरोधी धोरण आणि उरलीसुरली कसर अवकाळी पाऊस, धुके पूर्ण करतो. त्यामुळे आपल्या लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हा बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला येतो. त्यावेळी आपल्या वृध्द माता पित्या, पत्नी आणि लेकरांकडे पाहुन हताश झालेला हा जगाचा पोशिंदा झाडावर लटकणार नाही तर मग काय करणार? विचार केला तर किती ह्रदयद्रावक घटना आहे. मन अक्षरशः छिन्नविछन्न होते.

           नुकतेच अवकाळी पावसाने शेतक-यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आणले. हाता तोंडाशी आलेले पिक काढण्याच्या वेळीच अवकाळी पावसाने त्यावर पाणी फेरले. कधी निसर्गाने साथ दिलीच तर आडते, दलाल शेतमाल कवडीमोल भावात विकत घेतात. रात्रंदिवस मर मर करुन पिकविलेल्या शेतीचा भाव ठरविण्याचा अधिकार दलाल, अडते यांना कसा? हेच दलाल एका क्षणात लाखो, करोडो रुपये कमावतात. आणि माझा शेतकरी त्याचे हक्काचे पैसे मिळविण्यासाठी भिका-यासारखा वाट पाहत राहतो. हि किती संतापजनक गोष्ट आहे. कित्येक शेतकरी तर शेतमाल विकण्यासाठी काही दिवस रांगेत उभे असतात. आणि ज्यावेळी नंबर येतो त्यावेळी भाव पडलेला असतो. अशावेळी त्याचा नफा तर सोडाच पण शेतीला लावलेला पैसाही वसूल होत नाही मग टॅक्टरचे भाडे कुठून भरणार? म्हणून माल तसाच सोडून घरी येतो आणि जड अंतकरणाने फास घेतो. आपली लेकरं बाळं खाऊची वाट पाहत असतील, त्यांना खाऊ कुठून आणणार? म्हणून तो मरणाची वाट धरतो किती हि दुर्देवाची आणि खेदजनक गोष्ट आहे.

           शेजारी देशांमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे सरकारने निर्यात धोरण बदलून खुले केल्यास शेतक-यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकेल. पण, सरकार हे व्यापाऱ्यांचा विचार करते. "शेतकरी मेला तरी चालेल पण व्यापारी जगला पाहिजे" हे सरकारचे धोरण आहे. शेतक-याच्या मालाला हमी भाव नाही. सरकारकडून कोणतीही मदत नाही. मध्यंतरी शेतीसाठी केंद्र सरकारने तीन कायदे संसदेत पास केले. ते शेतक-यांसाठी मारक आणि व्यापाऱ्यांसाठी फायदेमंद होते. म्हणून वर्षभर शेतक-यांनी आंदोलन केले. त्यात कित्येक शेतकरी  ऊन, वारा, थंडी, पाऊस सहन न होऊ शकल्यामुळे अक्षरशः मेले. तरीही या निर्दयी सरकारला जाग आली नव्हती. त्यांच्या आंदोलनाच्या मार्गात खिळे ठोकले , पाण्याचा मारा शेत-यांवर केला. अतोनात हाल केले. जे इंग्रजांनी केले नाही ते आपल्या मायबाप सरकारने केले. आपल्याच जनतेवर ते ही जगाच्या पोशिंद्यावर असा अन्याय करणे हिटलरलाही लाजवेल असे हे कृत्य होय. बिच्चारा शेतकरी चहुबाजूंनी अडचणीत सापडला आहे. निसर्गाचा अनियमितपणा आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण त्यामुळे जगाचा पोशिंदाच उपासमारीच्या वाटेवर आहे. यावर वेळीच उपाय शोधला नाही, आणि बळीराजाच संपावर गेला, तर संपूर्ण जग तडफडून मरेल. 

आधीच कपाशी कांद्याने मेला
आणि आता अवकाळीने मेला
पन्नास खोक्याने माझा शेतकरी
जिवंतपणीच स्मशानात गेला
अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे!
✍️

Scroll to Top