ओमराजे कांबीलकर…सामाजिक आणि राजकीय वास्तव परखडपणे मांडणारे …

www.janvicharnews.com
आपल्या समोर पसरलेल्या हातावर एक रुपया ठेवण्याची मानसिकता नसलेली माणसे दगडात देव शोधतांना दिसतात. श्रध्दा असावीच, परंतू देवाला आमिष दाखवून त्यांचेकडून आपल्यासाठी काहीही मागणे म्हणजे श्रध्दा नाही. आणि देवावरही विश्वास न ठेवता भोंदू साधु- मांत्रिकांवर विश्वास ठेवून लुटली जाणारी मंडळीही या पूरोगामी महाराष्ट्रात कमी नाही. भोंदू मांत्रिकांच्या नादात सांगली जिल्ह्यातील एकाच कुटूंबातील 9 जणांचा खून महाराष्ट्राला हादरा देणारा आहे. अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रमुख नरेन्द्र दाभोलकर यांना का मारण्यात आले ? हे आम्हाला अजूनही लक्ष्यात आले नाही. विज्ञानवादी दृष्टीकोण ठेवून श्रध्दा ठेवण्यासाठी त्यांची लढाई होती. परंतू सनातनवाद्यांना ती मान्य नाही. आजही या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रध्देचे बळी ठरणार्यांची संख्या कमी नाही. देवाला नवस केला जातो; बोकडाचा, कोंबडीचा, पायी येवून नवस फेडण्याचा आणि कशासाठी ? तर मुलबाळ होण्यासाठी, गुप्त धन मिळविण्यासाठी, मुलगा एमपीएसी, युपीएसीत उत्तीर्ण होण्यासाठी, मग मांत्रिक सांगेल तसे करण्यासाठी कुमारी बालिकेचा बळी दिला जातो, लहान मुलाचा बळी दिला जातो. महाराष्ट्रातील आदिवासी भागात आजही अशा घटना घडतांना दिसतात. करणी करणे, क्षारणे, गाईचे दुध घालविणे, यासारख्या गोष्टीसाठी बुवाबाजी, मांत्रिक-तांत्रिक यांच्या माध्यमातून गंडा दोरे, ताविज, होम हवन; जमिनीत काहीतरी गाडणे असे प्रकार केले जातात. आजही हात पाहुन भविष्य सांगणारे, मातीचा गुलाल करणारे, निखार्यांवर चालणारे, अंगात येणारे अनेक प्रकारचे भोंदू समाजात फिरतात, आणि सावज शोधतात.
कुणीतरी त्यांच्या हाती लागतो. ही प्रस्तावना करण्याचे कारण एव्हढेच की, सांगली जिल्हयातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुबातील नऊ जणांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची बातमी मागील काही दिवसापूर्वी येवून गेली. सुशिक्षीत कुटुंब आणि त्यात एक प्रॉक्टिसिंग डॉक्टरांचा समावेश होता. दोन महाविद्यालयीन तरुण-तरुणी यात होते. त्यांनी सामुहिकपणे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली अशा आशयाचे वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. डॉ. माणिक यल्लमा वनमोरे, पोपट यल्लमा वनमोरे या दोन भावांच्या कुटुंबातील या दोन्ही भांवासह नऊ जणांची आत्महत्या बुध्दीला पटण्यासारखी नाहीच.
म्हणून पोलिसांनी अतिशय गुप्तपणे या घटनेचा शोध घेतला. आणि पोलीस तपासात धक्कादायक माहिती बाहेर आली. या नऊ जणांनी आत्महत्या केली नसून दोन भोंदू मांत्रिकाच्या नादात लागलेले वनमोरे कुटुंब मंत्रिकाच्या सल्ल्याने व्यवहार करु लागले. आज नाही तर उद्या आपल्याला यश मिळेल या भावनेतून सावकारांकडून कर्ज घेवून मंत्रिकांना देवू लागले. हे पैसे उद्योग, शेतीसाठी घेतले नाहीत तर मंत्रिकाना देण्यासाठी घेतल्याचे निष्पन्न झाले.
यातून वनमोरे, कुुटुंब कर्जबाजारी झाले. डॉ. माणिक वनमोरे यांचा वैद्यकीय व्यवसाय अतिशय चांगल्या पध्दतीने सुरु होता. त्यातून त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेवी देखील ठेवल्या होत्या.
परंतू मंत्रिकाच्या नादात हे सुशिक्षीत कुंटुंब आपला ‘विवेक’ विसरुन मांत्रिक सांगेल ते करु लागले.
शेवटी मंत्रिकांनी विषारी औषध पाजून अत्यंत थंड डोक्याने वनमोरे कुटुबांतील नऊ लोकांना विष पाजले. अर्थात हे मंतरलेले पाणी आहे, कडू लागले तरी डोळे मिटून प्या असा सल्ला मंंत्रिकाने दिला असेल. पोपट वनमोरे आणि डॉ. माणिक वनमोरे यांचेसह या दोन्ही भावांच्या धर्मपत्नी, त्यांची मुले अशा नऊ लोकांना यमसदनी पाठविणारे राक्षस आजही अनेक गांवामध्ये फिरतांना दिसतात. पूरोगामी महाराष्ट्रात आजही एकाच कुटूंबातील नऊ लोक अंधश्रध्देचे बळी ठरतात. आणि आम्ही आजही अंधश्रध्देच्या मायाजालातून बाहेर पडू शकत नाही.
जीवंतपणी आईवडीलांची सेवा न करणारा शिकलेला वर्ग आजही मोठया प्रमाणावर नारायण नागबली, त्रिपींडी, कालसर्प, सारखे प्रकार करुन आपल्या पूर्वजांना, वाडवडिलांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. आणि चूकीच्या पध्दतीने स्वतःचे समाधान करुन घेतात. कर्मकांडातून सामान्य माणसाला बाहेर पडू द्यायचे नाही अशी विचारधारा आजही देशात काम करते आहे आणि विवेक विसरलेला समाज त्या कर्मकांडात गुरफटला जातो आहे. संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्राम गीता आजच्या 21 व्या विज्ञान- तंत्रज्ञानाच्या युगातही तंतोतत लागू पडते हे पीएचडी प्राप्त माणसाला का कळत नाही याचे दुखः आहे. परंतू शरीर विज्ञानशास्त्राचा अभ्यास केलेले डॉ. माणिक वनमोरे आमल्या कुटुबांसह अंधश्रध्देला बळी पडेले याकडे समाजाने लक्ष्य देण्याची गरज आहे. बस्स एव्हढेच…….
फोटो