फळछाटणी – द्राक्ष पिकांचा एक महत्वाचा टप्पा
श्री.सतिश भोसले
नमस्कार द्राक्षबागायतदार बंधुनो,

www.janvicharnews.com
द्राक्ष बागेतील फळछाटणी व्यवस्थापन समजून घेत असताना द्राक्ष बागेतल्या फळ छाटणी अवस्थेअगोदर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरड छाटणी व्यवस्थापन होय, कारण जर खरड छाटणी व्यवस्थापन योग्यरित्या झाले तरच फळ छाटणी व्यवस्थापनाला महत्व आहे. थोडक्यात एप्रिल महिन्यात खरड छाटणी झाल्यानंतर बागेची योग्य ती काळजी घेतली तरच चांगल्या प्रकारे काडयांची निर्मीती होते व काडी फळधारणा युक्त असेल तरच फळछाटणी महत्वाची यात खरड छाटणीनंतर फुटून आलेल्या नविन फुटीतील योग्य ती फुट राखणे, अतिरिक्त फुटींची विरळणी करणे, दोन (फांद्या) काड्यामधील योग्य अंतर राखणे, वेळेवर सबकेन करणे, सबकेनच्या पुढील शेंडा योग्य वेळी मारणे, काडीवरिल पानांची संख्या नियोजन करणे, अन्नद्रव्यांचा व्यवस्थीत पुरवठा करणे, वेलीस रोग व किड यापासून नियंत्रणात (मुक्त) ठेवणे, काडी पक्वता निर्मीती योग्य नियोजन करणे यासारख्या अनेक महत्वाच्या घटनांचा समावेश होतो आणि यानंतर काडी चांगली परिपक्व होत जाते.
काड्याची परिपक्वता होण्यासाठी खरड छाटणीपासून साधारणतः १४० ते १५० दिवसांचा कालावधी लागतो. यानंतर बागेत फळछाटणी केली जाते. ही छाटणी ऑक्टोंबर महिन्यात होते. काही भागात अर्ली फळछाटणी होते, फळछाटणीनंतर बागेत घडाच्या विकासासाठी आवश्यक असे पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे असते त्याचबरोबर वेलीस योग्य वळण देणे, फेलफुटी (वांज फूट) योग्य वेळेत काढणे, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, अन्नद्रव्यांचे काटेकोर व्यवस्थापन, रोग व किड व्यवस्थापन आणि संजीवकांचा योग्य प्रमाणात वापर इ. बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
द्राक्षबागेत फळछाटणीपासून ते फळ काढणीपर्यंतच्या महत्वाच्या अवस्था खालीलप्रमाणे…
खरड छाटणी पासून साधारणतः १४० ते १५० दिवसांमध्ये काडयां परिपक्व होतात यानुसार फळछाटणीचे नियोजन करावे.
फळछाटणीच्या १५ दिवसांपूर्वी पानगळ करावी. पानगळीची बागेतील अवस्था पाहुन कालावधी कमी जास्त करावा. साधारणतः ७० ते ८०% पानगळ झाल्यास अशा बागेत लवकर फळछाटणी करावी. फळछाटणीनंतर ७ ते ८ दिवसांनी पोंगा अवस्था येते. त्यानंतर १० ते १२ दिवसांमध्ये द्राक्ष घड दिसायला सुरवात होते, १४ ते १५ दिवसांनी बागेतील फेलफुटी (वांज फूट) काढून घ्याव्यात. त्यानंतर १८ ते २० दिवसांमध्ये घडाचा रंग पोपटी दिसायला सुरवात होते. यादरम्यान म्हणजे द्राक्षघड दिसायला लागल्यापासून ते घड पोपटी रंगाचा दिसेपर्यंत घड जिरने ही समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे वेळीच फेलफुटी काढून घ्यावे व वेलीला आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. त्यांनतर १८ ते ३२ दिवसांचा काळ हा द्राक्षघडाची प्रीब्लुम अवस्था असते. ३५ ते ४० दिवसांनी फुलोरा अवस्था, ४५ ते ५० दिवसांचा कालावधी हा द्राक्ष मणी सेट होण्याचा असतो, त्यानंतर मण्यांची वाढ होण्यास सुरवात होते साधारणतः ५५ ते ८० दिवसांचा हा काळ असतो. याकाळात मण्यांची साधारणतः ४ मिमी ते १६ मिमी ऐवढी वाढ अपेक्षित आहे. ८० ते ९० दिवसांनी द्राक्ष मण्यांत पाणी उतरायला सुरुवात होते. यालाच पाणी फिरणे असे संबोधण्यात येते. ९५ ते १३० दिवसांच्या कालावधीत मण्यांमध्ये गोडी निर्माण होण्यास सुरवात होते. साधारणतः फळछाटणीपासून १४० ते १५० दिवसांमध्ये द्राक्षफळ काढणीसाठी तयार होते. खडकाळ / मुरमाड जमिनीत मण्यांमध्ये गोडी व कलर लवकर येतो, त्यामुळे अश्या जमिनीत द्राक्षफळ काढणीसाठी लवकर तयार होते.
वरिलप्रमाणे द्राक्ष बागेत फळांची निर्मीती होण्यासाठी तसेच फळांमध्ये गराची उत्तम रित्या निर्मीती होण्यासाठी द्राक्ष बागेत काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यात वेलीवरील फुटींची योग्यवेळी विरळणी करणे, वेलीवर फुटींची संख्या नियोजन करणे, त्याचबरोबर वेलीच्या व काडीच्या जाडीनुसार किंवा योग्य पोषणानुसार घडांची संख्या निश्चित करणे, वेलीच्या व काडीच्या पोषणानुसार घडामधील मण्यांंची संख्या निश्चित करावी. मण्यांची व घडांची वाढ व विकास लक्षात घेऊन वाढीच्या अवस्थेनुसार संजीवकांचा वापर करावा. मण्यांची व घडांची वाढ व विकास लक्षात घेऊन वाढीच्या अवस्थेनुसार गरजेप्रमाणे अन्नद्रव्यांचा व पाण्याचा पुरवठा करावा. घड़ांच्या पुढे योग्य तितक्या पानांचे संख्या नियोजन करावे. काड्यांना वेळीच योग्य वळण देऊन बागेत मोकळी हवा खेळती राहिल याकडे लक्ष द्यावे यामुळे रोग व किड नियंत्रणात ठेवणे सोपे होते. अशाप्रकारे योग्य ते नियोजन करुन घड व मण्यांचा टिकाऊपणा व साठवणुक क्षमता उत्तम रित्या वाढवता येते व उत्पादनात वाढ होण्यासाठी मदत होते.
द्राक्ष फळछाटणी पुर्व व्यवस्थापन :-
द्राक्ष बाग फळछाटणी करण्यापूर्वी द्राक्ष बाग फळछाटणी पुर्व व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. माझ्या दृष्टीने फळछाटणीपूर्वी करावयाची सर्वात महत्वाची बाब म्हणजे द्राक्ष बागेतील माती परीक्षण होय. कारण आपल्या द्राक्ष बागेत कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात आहेत, कोणती अन्नद्रव्य जास्त व कोणती अन्नद्रव्य कमी याचा अचुक अंदाज आपल्याला येईल यामुळेच आपल्याला येत्या हंगामात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन अचुकरित्या करणे शक्य होईल. त्यामुळे आपल्या कडून होणारे चुकिचे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन आणि त्याचा माती, पाणी त्याचबरोबर वेलींवर होणारा परिणाम आपण टाळू शकतो व आपल्या कडून होणारा अवाजवी/ चुकीचा खर्च टाळता येईल पर्यायाने आपल्या द्राक्ष बाग फळछाटणीचे नियोजन करत असताना आपल्याला एक उत्तम अन्नद्रव्य व्यवस्थापन साध्य करणे शक्य होईल.
माती परिक्षण करण्याकरिता आपल्या बागेतील ड्रीपरपासून सुमारे दहा ते बारा से.मी पुढे वीस ते पंचवीस सेंमी खोल माती काढावी. अशाप्रकारे आपल्या एका प्लॉटमधून साधारणतः ४ ते ५ ठिकाणची माती काढून सर्व माती एकत्र गोळा करून त्याला व्यवस्थीत मिसळून त्याचे चार भागात विभागणी करून त्यातील दोन भाग कमी करून उरलेल्या दोन भागाचे परत चार भाग पाडावे असे चार पाच वेळा करुन शेवटी ५०० ग्रॅम माती शिल्लक राहिली पाहिजे म्हणजे ही ५०० ग्रॅम माती परिक्षणासाठी लॅबोरेटरीमध्ये पाठवावी.
द्राक्षाच्या बागेस पानगळ करण्याकरीता पाण्याचा ताण देणे:-
द्राक्ष बागेत खरड छाटणी नंतर काडीची परिपक्वता होण्यासाठी साधारणतः १४० ते १५० दिवसांचा काळ लागतो. म्हणून आपण फळछाटणी ही काडीची परिपक्वता झाल्यानंतर करतो. काडी परिपक्व झाल्यानंतर फळछाटणीच्या १५ ते १६ दिवसांपूर्वी पानगळ करावी लागते. त्यासाठी द्राक्ष बागेला पाण्याचा ताण द्यावा लागतो. पाण्याचा ताण दिल्यामूळे बागेत वेलिची नविन वाढ होत नाही व झाडावर काही प्रमाणात हिरवी राहीलेली काडी पक्व होते व अन्नसाठा वरिल नविन वाढीत नष्ट न होता तो परिपक्व काढीतच संग्रह होतो व हाच काढीतील अन्नद्रव्य साठा उद्याच्या छाटणीनंतर तेजदार घड निर्मीती होण्यात मदतगार होतो.
द्राक्षाच्या बागेस खते देणे:-
फळछाटणी पुर्वी किमान १० ते १५ दिवस अगोदर बेसल डोस द्यावा. यामध्ये एकरी १० टन चांगले कुजलेले शेणखत + सेंद्रिय खत २५० किलो + २०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति एकर किंवा ४०० ते ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रति वेल द्यावे. मातीपरिक्षणाच्या आधारे सुक्ष्म अन्नद्रव्ये एकरी १५ किलो फ़ेरस सल्फेट, १० किलो झिंक सल्फेट आणि २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे. (माती परिक्षण अहवालानुसार वरिल खतांच्या मात्रेत बदल होऊ शकतो.) फळ छाटणीपुर्वी आणि नंत्तर रासायनिक खते आणि सेंद्रिय खते देण्याचे प्रमाण ६०:४० असे असावे. कारण जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे कर्बाचे प्रमाण किमान १ टक्का असावे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण दिलेल्या अन्नद्रव्यांचे अपटेक होण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. अशा परिस्थितीत फळ छाटणी पुर्व व नंतरच्या काळात जिवाणु स्लरीचा वापर केल्यास अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते त्यात प्रामुख्याने मायकोर्हयझा, एनपिके कॉन्सर्शिया, पीएसबी, केएमबी यासारख्या जिवाणु खतांचा वापर करावा लागेल. त्याच बरोबर हिरवळीचे पिके ताग किंवा धैचा फुलावर आल्यावर वेलीच्या दोन्ही बाजुस एक फुट अंतरावर चर घेउन गाडावी. ज्या बागेतील मातीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे अशा बागेत सल्फर (गंधक) ५० ते ६० किलो प्रति एकर वापरावे.
सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी :- दर आठवड्याला मायक्रोन्युट्रीएंट स्लरी दिल्यास उत्पादन वाढ होऊन खर्चात बचत होईल. इतर अन्नद्रव्यांची वापर मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
1000 लिटर पाण्यासाठी प्रमाण खालील प्रमाणे…
मॅग्नेशियम सल्फेट = 35 किलो
फेरस सल्फेट = 20 किलो
झिंक सल्फेट = 25 किलो
मँगनिज सल्फेट = 15 किलो
अमोनियम सल्फेट = 10 किलो
कॉपर सल्फेट (खडा मोरचूद) = 5 किलो
सिविड एक्स्ट्रक्ट = 4 किलो
अमिनो असिड 80% = 4 किलो
फुल्विक असिड 85% = 4 किलो
पाणी = मिश्रण 1000 लिटर पुर्ण होईपर्यंत पाणी मिसळावे…
दररोज सकाळी व संध्याकाळी उजव्या बाजूने मिश्रण साधारणतः 12 ते 15 दिवसापर्यंत धवळून घ्यावे मिश्रण एकजीव झाल्यास वापरायला सुरूवात करावी. प्रत्येक आठवड्याला एक दिवस ठरवून त्याच दिवशी दर आठवड्याला प्रति एकरी 8 ते 10 लिटर बनवलेले द्रावण 200 लिटर पाण्यात मिसळून ड्रीपद्वारे सोडावे. उत्तम रिजल्टस मिळतील.
द्राक्ष बागेत फळछाटणीपूर्व पानगळ करणे :-
द्राक्ष बागेत फळछाटणी पुर्व पानगळ करण्याचा काळ खुप महत्त्वाचा असतो. वेलिवरील नैसर्गिक पानगळ अवस्था लक्षात घेऊन पानगळ कधी करावी हे ठरविता येते. पानगळ ही साधारणतः फळ छाटणीच्या १५ दिवस अगोदर करावी. हा कालावधी बागेतील पानगळ कमी/अधिक अवस्था पाहून ठरवावा. बागेमधिल पानगळ ही साधारणतः ७० ते ८०% झाली असल्यास अशा बागेची छाटणी लवकर करुन घ्यावी. बागेमध्ये नैसर्गिक रित्या पानगळ झाली नसल्यास इथेफॉन ची फवारणी घेऊन पानगळ करावी. इथेफ़ॉन २ ते ३ मिली प्रति लीटर पाणी व ४ ते ५ ग्रॅम ००:५२:३४ (विद्राव्य खत) याप्रमाणे फवारणी द्यावी. एकरी ४०० लिटर द्रावण करून फवारणी केली पाहिजे. पानांची खूपच गर्दी असल्यास ४०० लिटर ऐवजी ४५० लिटर द्रावण करून फवारणी केली पाहिजे. इथेफ़ॉनचा परिणाम चांगल्या प्रकारे जाणवण्यासाठी द्राक्ष बागेस पाण्याचा ताण बसणे आवश्यक आहे.
इथ्रेल फायदे :-
1) पाने हळू हळू पिवळे पडत पानगळ होते, पाने एकदम गळून न जाता हळू हळू गळतील आणि स्टोरेज चांगलं होईल.
2) पानातील अन्नघटक, कार्बोहायड्रेट, स्टोरेज, खताचे इतर अन्नघटक काडीत साठले जातात. नंतर छाटणीकरून पेस्ट केल्यानंतर जेव्हा डोळे फुटून बाहेर येतात तेव्हा हे सर्व घटक डोळ्यांना पूरक ठरतात.
3) घड जिरण्याचे प्रमाण कमी होते.
4) फ्लॉवरिंग एकसमान येते.
जमिनीचा योग्य निचरा – वापसा ठेवणे:-
फळ छाटणी करतांना बागेत वापसा ठेवणे अत्यंत आवश्यक असते. वाफसा म्हणजे काय? जमिनीच्या पृष्ठभागाखालि मुळयाच्या परिसरात, दोन माती कणाच्यामध्ये ज्या पोकळया असतात त्या पोकळयामध्ये फक्त पाण्याचे अस्तित्व नको तर पोकळयामध्ये ५०% पाण्याची वाफ व ५०% हवा यांचे मिश्रण हवे. या स्थितिला ” वाफसा ” म्हणतात.
दोन मातीच्या कणामध्ये ज्या पोकळया असतात त्या सर्व पाण्याने भरून जातात व तेथील हवा निघुन जाते. वाफा पाण्याने गच्च भरतो तेव्हा बुड- बुड असा जो आवाज येतो तो त्या निघुन जाणाऱ्या हवेचा असतो. परीणामी मुळया व जीवाणूना ऑक्सिजन मिळत नाही आणि जीवाणु मरतात व मुळया कुजतात. मुळाकडुन अन्नाचि होणारी उचल ( Mineral Uptake ) थांबते त्यामुळे पाने पिवळी पडू लागतात, वाढ खुंटते अर्थातच उत्पादनात घट. म्हणून मातीच्या दोन कणांमधिल पोकळयात पाणी साठणार नाही, तर त्या पाण्याची वाफ जमिनीतील उष्णतेने होईल ( जास्त पाणी साठले तर जमीन थंड पड़ते व वाफ बनत नाही ) व त्या पोकळयामध्ये ५०% पाण्याची वाफ व ५०% हवा यांचे मिश्रण होईल एवढेच पाणी असावे. जेणेकरून मुळीजवळ वाफसा राहील व अतिरिक्त पाणी गांडूळनी पाडलेल्या छिद्रातुन भूजल साठ्याकडे निघुन जाईल व वाफसा कायम राहील. छाटणीपुर्वी पावसाचे प्रमाण जास्त असते. य़ामुळे बागेत जास्त काळ पावसाचे पाणी साचुन राहिल्यास छाटणीनंतर फलीत डोळे फुटण्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणुन फळ छाटणीपुर्वी बागेत जास्तीचे पाणी साचु देवु नये किंवा छाटणीपुर्वी बागेला ब-य़ाच काळ पाणी नसल्यास बागेला भरपुर पाणी द्यावे. कारण मुळाभोवतालचे क्षार वाहून जातील. तसेच नंतर योग्य वापसा आल्यावर मशागत करावी.
छाटणीपुर्वी पिक संरक्षण :-
खरड छाटणीनंतर १२० ते १५० दिवसांपर्यत शास्त्रीयद्रुष्टया योग्य असलेली पाने फळ छाटणीपर्यंत कार्यक्षम असावी. उशीराचा पाउस किंवा आर्द्रता यामुळे डाऊनी (केवडा), भुरी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच उडदया किंवा लालकोळी या किडीची शक्यता असते. यासाठी बोर्डॊ मिश्रण १ टक्का तसेच त्यात ०.२ टक्के पाण्यात विरघळणारे गंधक याची एकत्र फवारणी करावी. तसेच जमिनीतुन ट्रायकोडर्मा २ लीटर प्रति एकर याप्रमाणे ड्रिपद्वारे २ ते ३ वेळा द्यावे.
तण नियंत्रण :-
फळ छाटणी पुर्वी बागेत असलेले हरळी, लव्हाळा, मारवेल या बहुवर्षीय तणांचे प्रमाण जास्त आढळते. हि तणे जर आपण छाटणी आगोदर कापणी करुन बोदावर टाकली तर काहि प्रमाणात त्यापासुन सेंद्रियखत तर मिळते तसेच मल्चिंग होऊन जिवाणूची संख्या वाढण्यास मदत होईल. कापणी नंतर बागेत कुळवणी करावी. त्यानंतर बोदावरील फुटलेल्या तणांवर पैराक्वाट ड़ायक्लोराइड ५०० मिली प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात आवश्यकते नुसार फवारणी करावी.
सूक्ष्म घड तपासणी :-
खरड छाटणीनंतर राखलेल्या काडयांवरील डोळ्यांमध्ये सुक्ष्मघड निर्मिती होते. सुक्ष्मघड निर्मितीचे प्रमाण काडीवरील नेमकी कोणत्या डोळ्यांमधे जास्त आहे. हे तपासण्यासाठी एक एकर क्षेत्रामधुन सर्वसाधारणपणे ४० ते ५० काडया वेगवेगळ्या वेलीवरुन घेउन डोळे तपासणी करुन फळ छाटणी करावी किंवा ज्यांना हे करणे शक्य नसल्यास काही वेलिवरील काड्या छाटणी करुन त्याची चाचणी करून बघावी. सर्वसाधारणपणे माझ्या अनुभवानुसार थॉमसन सीडलेस व इतर प्रजातीमध्ये सुक्ष्मघड निर्मिती ७ ते ८ किंवा ९ व्या डोळ्यामध्ये हमखास झालेली असते.
प्रत्यक्षात फळ छाटणी:-
फळ छाटणीची कामे वरीलप्रमाणे नियोजन करुन पुर्ण केल्यावर प्रत्यक्षात छाटणी करतांना वेलीवर राहिलेली पाने हाताने त्वरीत काढावी. छाटणी करतांना काडीच्या साईज नुसार ७, ८ किंवा ९ डोळे राखुन छाटणी करावी. त्याचबरोबर आपल्या बागेत जर सबकेनचा अवलंब केलेला असेल तर सबकेनच्या पुढे १ किंवा २ डोळे राखुन छाटणी करावी.
फळ छाटणी नंतरची कामे :-
१. फळछाटणी झाल्यानंतर छाटलेल्या काडया आणि जमिनीवर पडलेली रोगग्रस्त पाने गोळा करुन बागेच्या बाहेर काढावे. रोगग्रस्त पाने किंवा काडया जवळपास टाकल्यास रोगाचे अनकुल वातावरण मिळाल्यावर त्यावर रोगपरत्वे बुरशीची वाढ होते आणि त्याचा प्रसार नविन कोवळया फुटीवर होतो. त्यामुळे मुख्यता डाऊनी व करपा सारख्या रोगास सहज आमंत्रण मिळतेच आणि नंतर नियंत्रण करण्यासाठी खुप किंमती औषधाची फवारणी करावी लागते.
२. फळछाटणी नंतर वेलीच्या खोडावर उडद्या, पिठयाढेकुण(मिलीबग) यांच्या बंदोबस्तासाठी एकरी ४०० लिटर पाणी घेउन योग्य त्या औषधाची फवारणी करावी. त्यात मिलीबग नियंत्रणासाठी व्हर्टीसिलियम लेकानी या जैविक उत्पादनाचा फवारणी व आळवणी मधून सतत वापर केल्यास उत्तम नियंत्रण मिळवता येईल.
डोळे फुटतांना उडद्या त्रास देणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या बागेत फळछाटणी नंतर एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करावा. जेणे करून सर्वतोपरी नियंत्रण करणे शक्य होईल. पावसाळी वातावरणात बिव्हेरिया बॅसियाना, व्हर्टीसिलियम लेकानी, मेटाऱ्हिझियम ऍनिसोपली यासारख्या जैविक कीडनाशकांचा तर ट्रायकोडर्मा व्हिरीडी, सुडोमोनास, बॅसिलस सबटिलिस, अँपिलोमायसिस क्विसक्वालिस यासारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरेल यामुळे दीर्घकाळ नियंत्रण मिळेल व रोग व कीड नियंत्रणात होणाऱ्या खर्चात बचतही होईल. कीड व रोगांचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीच्या वरती असेल तर योग्य त्या रासायनिक कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा वापर करावा.
वेलीवरील डोळे एक सारखे फुटण्यासाठी :-
फळछाटणी नंतर हवामानाची प्रतिकुल परिस्थीती असेल, तर हायड्रोजन सायनामाईड डोळे फुटण्यासाठी प्रभावी आहे. हल्ली ते बाजारात डॉरमेक्स, क्रिडोर, डॉमेट य़ा नावाने उपलब्ध आहे. प्राप्त हवामानाची परिस्थीती व काडीची जाडी लक्षात घेऊन औषधाचे प्रमाण (हायड्रोजन सायनामाईड) ३० ते ५० मि.ली./प्रती लिटर घ्यावे. मिश्रण तयार करत असताना हायड्रोजन सायनामाईडच्या द्रावणात लाल रंग टाकण्याऐवजी मॅन्कोझेबसारखे बुरशीनाशक ३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापरल्यास काडीवर ज्या डोळ्यांवर पेस्टिंग केले आहे तेथील डोळे या रोगांपासून संरक्षित राहतील. डॉगरीज करीता छाटणीनंतर पुन्हा हेच प्रमाण तिस-या दिवशी वापरावे व नेमकेच मालाचे डोळे उठवुन घ्यावे…!!!
टीप:- आपल्या द्राक्ष बागेतील माती, पाणी, पान, देठ आणि काडी परिक्षण अहवाल नोंदी लेखनापासुन खत, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दररोजच्या नोंदी ठेवण्यासाठी तसेच द्राक्ष बागेतील अन्नद्रव्य व रोग-कीड व्यवस्थापन माहितीसाठी व कमीत कमी खर्चात एक्सपोर्ट दर्जाच्या द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष नोंदवहीचा वापरा करावा…
पुढील सविस्तर माहिती क्रमशः
—-
!! अन्नदाता सुखी भव: !!
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
विचार बदला! जीवन बदलेल!!