बेने इस्राइल
इस्रायल म्हटले की, राष्ट्रनिष्ठा, धाडस, आधुनिकता आणि तालिबान सारख्या कडव्या अतिरेक्यांना तसेच शेजारच्या पाच मुस्लिम राष्ट्रांना पुरुन उरलेले राष्ट्र. वाळवंटी प्रदेशातही ठिबकच्या साह्याने कृषिक्षेत्रात अव्वल ठरलेले राष्ट्र. ज्यू किंवा यहुदी हा त्यांचा मूळ धर्म असून ते अब्राहम यांना मूळ पुरुष मानतात. अब्राहमचा वंशज जेकबला ईश्वराने इस्राइल हे नाव दिले. अरबस्तांनातील यहुद प्रांतात यांची वस्ती होऊन त्यातून अनेक टोळ्या तयार झाल्या. इसवी सन पूर्व 175 ला असिरियन लोकांनी यहुदींचा भाग जिंकून घेतल्यानंतर तेथील 12 टोळ्यांनी स्थलांतर केल्यानंतर त्यातील एक टोळी रायगड जिल्ह्यातील नागावला पोहोचताना त्यांच्या जहाजाला अपघात होऊन त्यातील फक्त सात जोडपी जीवंत राहिली. त्यांनी रायगड परिसरात आश्रय घेतला. लोकांनी जेव्हा विचारले तुम्ही कोण? त्यांनी उत्तर दिले, आम्ही बेने इस्राइल. बेनेचा अर्थ पुत्र, त्यानुसार आम्ही इस्राइलचे पुत्र. काही टोळ्या कोचीनला उतरल्या त्यांना कोचीन ज्यू म्हटले तर इराक परिसरातून आले त्यांना बगदादी ज्यू , ईशान्येकडील ज्यूंना ब्नेई मेनाशी नाव पडले.
बेने इस्राइल लोकांचे महाराष्ट्रातील आगमन हजार वर्षापेक्षा जास्त जुने असून अलिबाग, मुंबई, पुणे, पनवेल, रोहा, मांडवी, माझगाव, भायखळा भागात स्थिरावलेल्या या समाजाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. मुलांची आठव्या दिवशी सुंता करणे, प्रार्थना करणे आणि मुळचा तेलाचा व्यवसाय सुरू केला. मराठी तेली महादेवाचा वार म्हणून सोमवारी तेलाचा घाना बंद ठेवत तर बेने शब्बात म्हणजे शनिवारी तेलघाना बंद ठेवायचे म्हणून त्यांना शनिवार तेली नाव पडले. गाझा पट्ट्यात ज्यू आणि मुस्लिम यांच्यात टोकाचे शत्रुत्व असले तरी भारतात मात्र ते सर्वांशी सलोख्याने वागतात. हजारो वर्षाच्या सहवासातून त्यांच्या नावातही मराठमोळेपणा आला. उदा. इजाकील – हसाजी, बेंझामीन – बुनाजी, अब्राहीम – अबाजी, सॅम्युएल – समाजी, इसाक – इसाजी, जोसेफ – एसोजी, रहमीन – रामजी. त्यांच्या बायकांनाही लाडुबाई, आक्काबाई, बबई, जैतुबाई, ठकुबाई याप्रमाणे नावे घेतली. गावावरुन झिराडकर, शापूरकर, राजापूरकर अशी आडनावे आली. याशिवाय या तीन घराण्यातील व्यक्तींना काझीपद देऊन त्यांच्याकडून जमेल तसे धर्मसंस्कार करुन घेतले. आपण कोण कुठले याची व्यवस्थित जाणीव नसतानाही आपला रोटीबेटी व्यवहार आपल्याच धर्मात ठेवत त्यांनी यहुदी धर्म टिकविला. हिब्रू आणि मराठीचे संकर होऊन त्यातून जुदाव मराठी ही नवी भाषा मिळाली. जग जवळ आलेतसे 16 व्या शतकात त्यांच्यात खूप जागृती होऊन त्यांनी आपल्या धर्मावर लक्ष केंद्रीत करून सिनेगॉग बांधून त्यात प्रार्थना करू लागले. त्यांच्या सिनेगॉगमध्ये मूर्तीऐवजी सेफेरटोरा नावाचा पवित्र ग्रंथ पश्चिमेकडे ठेऊन शनिवारी त्याचे वचन होते. त्यांच्या सणावरही मराठीच्या नावाचा पगडा पडला, त्यात नव्याचा सण, खिरीचा सण, दारफळनीचा सण असे सण आले तर मुस्लिम धर्माच्या सहवासातून नव्याचा रोजा, शब्बानी रोजाही धरू लागले. लग्न समारंभातही हिंदूप्रमाणे हळद खेळणे, वटभरण, मंगळसूत्र घालणे या परंपरा स्विकारल्या. ज्यू धर्माचा अभ्यास केल्यानंतर फक्त भारत सोडून जगात कोठेही त्यांना शांतता मिळाली नाही. हिटलरने तर त्यांच्यावर अमानवीय अत्याचार केले.
छत्रपती शिवरायापासून ते स्वतंत्र भारताच्या लष्करातही त्यांनी आपले योगदान दिले. जंजिरा संस्थानचे पंतप्रधान म्हणून शलोम बापूजी, त्यांचे बंधु जेकब बापूजी औंध संस्थानचे पंतप्रधान, तर मुलगा हाईम बापूजी अक्कलकोट संस्थानचे पंतप्रधान राहिले. हेच हाईम बापूजी 1931 ला खानदेशचे मामलेदार झाले. पुण्याच्या रास्तापेठेतील बेने इस्राइलच्या वस्तीला इस्राएल आळी नाव मिळाले. महाराष्ट्रातील बेने इस्राइली हे मोठे धनवान असून त्यांनी समाजसेवेसाठीसुद्धा खूप मोठे काम केले. त्यातील डेविड ससून या कुबेराकडे तब्बल सतरा कापड गिरण्या असून त्यातून 22 हजार लोकांना रोजगार मिळाला. 1867 साली पुण्यात बांधलेले ससून हॉस्पिटल ही त्यांचीच देणगी असून त्यातूनच पुढे बीजे मेडिकल कॉलेजची निर्मिती झाली. याच ससूनमध्ये अभिनेत्री मिनकुमारीपासून ते महात्मा गांधीपर्यंत अनेकावर इलाज झाले. मुंबईतही गेट वे ऑफ इंडियापासून ते जहाज वाहतुकीसाठीच्या गोदी बांधकामात त्यांचा मोठा सहभाग राहिला. 1971 च्या भारत पाक युद्धात लेफ्टनंट जनरल जेकबनी पराक्रम दाखविला तर निसीम इजेकिल यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्याच बहीण निसीम या मराठीच्या नामांकित प्राध्यापिका म्हणून पुढे आल्या. त्यांनी आत्माराम भेंडेसोबत विवाह केल्याने आशा भेंडे म्हणून मराठी सिनेमा, नाटके यांच्यातही नाव काढले. रचेल वरुळकर, अबीगेल मोसेज यांनी पुण्यातील हुजूरपागा शाळेचे प्राचार्यपद भूषविले. 1880 साली या मंडळींनी आपले स्वतंत्र भजनी मंडळ मराठी भाषेतून कीर्तन भजन करू लागले.
दोन हजार वर्षापासून महाराष्ट्रासह भारताच्या इतर भागात रहात असताना यहुदींनी देशाला खूप काही दिले. चौदाव्या शतकापासून त्यांनी अनेक वास्तू बांधल्याचे पुरावे असूनही त्यांनी कधी विवाद उत्पन्न केला नाही. खासकरून महाराष्ट्रातील बेने इस्राएली या मातीत एकरूप होऊन गेले होते. दुसर्याला कधीही उपद्रव न देणार्या यहुदींना आपल्या मातृभूमी गाझापट्टीपासून ते जगभरात अनेकप्रकारच्या जाचांना सामोरे जावे लागले. त्यामुळे वारंवार त्यांचे स्थलांतर झाले. शेवटी 1948 साली यहुदींनी इस्राइल देशाची निर्मिती करून जगभरातील आपल्या बांधवांना इस्राइलमध्ये येण्याची विनंती केली. त्यामुळे 1970 पासून भारतमातेच्या आश्रयाला आलेल्या यहुदींनी इस्राइलमध्ये जायला सुरुवात केली. रायगडसारख्या सह्याद्रीच्या कुशीतून बेनेमंडळी जेरुसेलम, तेलअविव, अशदोद, हायफा, लुद, किर्यातसारख्या शहरात स्थलांतरीत झाली. खरंतर हे अनोखे स्थलांतर होते, हजारो वर्षापासून ज्या भूमीत राहिलो त्याला पारखे करून नव्या जगात जायचे म्हणजे अद्भुत होते. भाषा, संस्कृती, खानपान मराठी असल्याने बेने कंपनीला भारतभूमीची आठवण येणे स्वाभाविक होते. इस्राइलमध्ये गेलेतरी त्यांनी आपल्या कुरड्या पापड्या सोडल्या नाही, तेथे मराठी शाळा, महाविद्यालये काढण्यात आली. रायगडनजीकच्या तळे गावात जन्मलेल्या नोहा मस्सीलसारखा शिवसैनिक तेथे गेल्यावरही तेवढ्याच जोमाने कामाला लागला. इस्राइलमध्ये राहायचे असेलतर हिब्रू शिकले पाहिजे, हे खरे असलेतरी या पठ्ठ्याने तेथे ‘मायबोली’ नावाचे मासिक काढून मराठीसाठी आयुष्य घालविले. त्यामुळे तेथील मराठा मंडळी नोहाला हिब्रू मास्तर म्हणू लागली.
बेने इस्राएली तेथे गेल्यानंतरही मराठे मातीला विसरले नाहीत. 1 मे मराठी दिवस म्हणून साजरा करतात. कांदा पोहे, मिसळपाव, मटन मसाला, उकडीचे मोदक, कोकणातील मासळी अशा कित्येक पदार्थाची चव अजूनही त्यांच्या जिभेवर रेंगाळत आहे. पण.. किती दिवस. येथून गेलेली मंडळी आता वयस्कर झाली आणि हळूहळू मराठी लोप पावायला लागली. रायगड परिसरातील बेने इस्राइल मंडळीने शिवरायांचा पराक्रम उघड्या डोळ्यांनी पाहिला, म्हणून आजही त्यांच्या पुर्वजांच्या तलवारी त्यांनी जपून ठेवल्या आहेत. बाकी काही असो या भारतमातेने कित्येक बेन्यांना आश्रय दिला. परंतु यहुदी बेने तिच्या सख्ख्या लेकरासारखा वागले. हजारो वर्षे इथं राहूनही बेने इस्राएलींची कुठल्या गोष्टीवर हक्क सांगितला नाही. उलट वास्तू देऊन गेले, आणि संस्कृती घेऊन गेले.
प्रा. डॉ. सतीश कदम