भ्रष्टाचारी आमदारांमुळे पक्ष फुटले.

कांग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना या पक्षातील आमदार पक्ष सोडून भाजपचे सहयोगी बनले.कारण होते फक्त इडीची भीती.जेलमधे जाण्याची भीती.जे आमदार पक्ष सोडून गेले त्यांचे पक्षनेत्यांशी कोणतेही वाद नव्हते.कधी चर्चा झाली नाही.कोणीही एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केला नाही.आपसात तू तू मैं मैं झाली नाही.आज जरी एकमेकांचे उखाणे पाखाणे काढत असले तरीही असे पक्ष सोडण्यापूर्वी कधी ऐकण्यात आलेच नाहीत.उलट आमदारांकडून पक्षनेत्यांना तोंडी आणि लिखीत विनंती केली जात होती कि,आपले आमदार इडी आणि बेडी पासून वाचवायचे असतील तर भाजप सोबत गेले पाहिजे.का गेले पाहिजे ?कारण भाजप सोबत गेलो तर इडी ची नोटीस येणे बंद होईल.चौकशी होणे बंद होईल.झाले तसेच.कांग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचे आमदार भाजप सोबत गेल्यानंतर इडी चा ससेमीरा बंद झाला.हा अंदाज नाही.तर्क नाही.तर आहे घटनात्मक सत्य.
पक्ष फुटल्यानंतर पक्षनेत्यांना अपेक्षा होती कि,जे गेले त्यांचे पक्षांतर बंदी कायद्यानुसार आमदार पद रद्द होईल.ते अपात्र ठरतील.आपली आमदार संख्या कमी होईल.इतकेच.पण परिणाम भयंकर वाईट निघाला.पक्ष संस्थापक नेता पक्षविहीन झाला.कमाल आहे! मुलाचा बाप बेवारस बनला.अशी अवस्था होईल असे त्यांना कधीही वाटले नव्हते.पण झाले.एकाचे नाही,चक्क दोन पक्ष नेत्यांचे.पक्ष प्रमुख आणि पक्ष संस्थापक हतबल झाले.हताश झाले.नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेण्याची वेळ आली.हे तर अतिभयंकर झाले.कारण होते आमदारांचा भ्रष्टाचार आणि त्यामुळे इडी ची भीती.
हे कोणीही कितीही लपवत असले तरीही लपत नाही.कितीही संताप केला तरीही झीज भरून काढता येत नाही.शिव्या शाप,बद दुवा देण्याशिवाय दुसरे काहीच उरले नाही.ईश्वर करो,शत्रूला ही अशी परिस्थिती येऊ नये.पण ईश्वराने सुद्धा बुद्धी द्यावी कि पुन्हा भ्रष्टाचारी लोकांना आमदाराची उमेदवारी देऊच नये.जरी आपल्या पक्षात भ्रष्टाचारी पदाधिकारी असले तरीही त्यांना डावलून प्रामाणिक लोकांना आमदाराची उमेदवारी दिली पाहिजे.निवडणुकीत पैसा लागतो.तो प्रामाणिक माणसाकडे नसतो.तर आपल्याच पक्षातील भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्यांकडून तो पैसा काढून प्रामाणिक पण निर्धन उमेदवाराच्या निवडणूक कामी वापरला पाहिजे.म्हणजे श्रीमंत पदाधिकारी ही आपलाच आणि प्रामाणिक आमदार ही आपलाच.असे प्रामाणिक आमदार पक्ष सोडून जाण्याची शक्यता कमी असते.प्रामाणिक आहे म्हणून इडी काहीच करू शकत नाही.प्रामाणिक आहे म्हणून तो आतापर्यंत निर्धन राहिला.असा प्रामाणिक आमदार आपले निर्धारित विधायक काम करण्यात जास्त व्यस्त असतो.त्याला तोडणे,फोडणे,बिघडवणे मुश्कील काम असते.त्यामुळे आपला पक्ष फुटण्याची शक्यता कमीच असते.उलट अशा प्रामाणिक आमदारांमुळे इतर मतदारसंघात चांगला प्रभाव पडतो.इतर मतदारसंघात आणखी आमदार निवडून येऊ शकतात.प्रामाणिक आमदारांची सरकार ला सुद्धा भीती वाटते.एकटे गांधीजी इंग्रज सरकारला नाकी नऊ आणत होते.गांधीजींना टॅकल करताच येत नव्हते.कारण ते प्रामाणिक होते.फक्त प्रजेशी नव्हे, इंग्रजांशी सुद्धा!
उद्धव ठाकरे आणि शरद पवार या प्रसंगातून काही धडा घेत असतील तरच त्यांनी पुढील निवडणूक लढवावी.अमिबा सारखा वारंवार पक्ष फुटी मुळे सापसीडीचा खेळ होतो.महत्प्रयासाने सत्तेपर्यंत पोहोचतात तोपर्यंत आमदार घसरून दुसऱ्या पक्षात जाऊन पडतात.
आता आम्ही मतदार पेपरला वाचतो, टिव्हीवर पाहातो कि,हे पक्षनेते पुन्हा सराईत चोरांचा शोध घेत आहेत.पैसा आहे म्हणून भ्रष्टाचारी माणसाला उमेदवारी देत आहेत.निवडून आणले तरीही ते टिकणार नाहीत.पुन्हा तेच.ये रे माझ्या मागल्या.शिवसेना आणि राष्ट्रवादी ने रोपटे लावावीत आणि भाजप ने कुऱ्हाड चालवावी.

Scroll to Top