मराठवाड्यातील बहुजनांचे पहिले वकील नरसिंगरावदादा देशमुख काटीकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ..
प्रा. डॉ. सतीश कदम
उस्मानाबाद जिल्हा हा तेव्हाच्या निजाम स्टेटमध्ये मोडत असल्याने उच्च शिक्षण घ्यायचे असेलतर त्यांना थेट हैद्राबादला जावे लागायचे. त्यामुळे सर्वसामान्य घरातील मुले शिक्षण अर्धवट सोडून शेतीबाडी करायची. अशावेळी 15 जुलै 1908 रोजी तुळजापूर तालुक्यातील काटी गावातील एका सधन देशमुखाच्या घरी त्यांचा जन्म झाला. वडील बलभीमराव हे त्याकाळातील नामांकित पाटील देशमुख आणि उत्तम शेतकरी असल्याने त्यांनी जात्याच हुशार असणार्या आपल्या मुलाला शिक्षणासाठी कशाचीही कमतरता पडू दिली नाही.
वकील नरसिंगरावदादा देशमुख काटीकर
www.janvicharnews.com
त्यामुळे नरसिंगरावांचे 7 वी पर्यंतचे शिक्षण तुळजापूर येथे तर मॅट्रिकसाठी ते गुलबर्गा येथे गेले. त्यानंतर हैद्राबादला जावून त्यांनी बी. ए. एल. एल. बी. ची पदवी घेतली. 1934 साली त्यांनी उस्मानाबाद याठिकाणी वकिली व्यावसायाला सुरुवात केली. तेव्हा मराठवाड्यातील बहुजनांचे पहिले वकील होण्याचा मान त्यांना मिळाला .
त्यांची वकिली म्हणजे सर्वसामान्यांची सेवा होती. त्यामुळे ते हैद्राबाद मुक्ति संग्रामासोबत जोडले गेले. बार्शी तालुक्यातील पानगावच्या कॅम्पवरुन इरले वैरागचे ज्ञानेश्वर पाटील यांच्यासोबत त्यांनी निजामाविरोधात मोठा लढा उभा केला. गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत म्हणून शिक्षण परिषेदेची स्थापना करून विविधठिकाणी वसतिगृहे काढली. या शिक्षण परिषदेचे ते 7 वर्ष अध्यक्ष होते. या शिवाय उस्मानाबाद, तुळजापूर, औरंगाबाद, परंडा, बीड इत्यादि ठिकाणी आज दिसणार्या शिक्षणसंस्था काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. उस्मानाबाद बार कॉन्सिलचेचेही ते अध्यक्ष राहिले.
उस्मानाबाद जिल्हा आर्य समाजाचे ते पहिले अध्यक्ष तर मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाची स्थापनाच मुळी त्यांच्या काटी गावातील निवासस्थानी झाली. 1948 ते 1954 पर्यन्त त्यांनी राजकरणात सक्रिय राहून शेतकरी कामगार पक्षाची मोठी बांधणी केली. त्यांच्या कुशल मार्गदर्शांनामुळेच पुढे भाई उद्धवराव पाटील, विश्वासराव पाटील, राजेंद्र देशमुख, माणिकरावजी खपले, पंडितराव चेडे, भगवानराव धस यासारखी त्यागी माणसं पुढे आली. त्यांच्यामुळेच 1952 सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील विधानसभेच्या 7 मतदार संघापैकी 3 मतदार संघातून म्हणजे उस्मानाबाद भाई उद्धवराव पाटील, कळंब अच्युतराव कवडे तर परंड्यातून विश्वास पाटील विजयी झाले. जिल्ह्यातील 90 पैकी 70 ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाने जिंकल्या. दुर्दैवाने 1952 च्या उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून ते पराभूत झाले. मात्र लगेचच त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्याचा कालावधी फक्त दोनच वर्षाचा होता, त्यामुळे 1954 ते 1960 साठी पुन्हा एकदा ते राज्यसभेवर गेले. विधानसभेकरिता त्यांनी 3 वेळा विविध ठिकाणी प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यांच्या एकंदर कारकीर्दीचा आढावा घेतला असता दुसर्यांना संधी देणे हे त्यांचे मोठेपण होते. म्हणूनच त्यांनी आपला वारसा मेव्हुणे ( पत्नीचे भाऊ ) असणारे भाई उद्धवराव पाटील यांना दिला. जेव्हा उस्मानाबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष शेकापचे चंदरराव निंबाळकर झाले तेव्हा उस्मानाबाद शहराला पहिल्यांदा लाईट आली. तर तुळजापूर शहरातील शिवरायांचा पुतळा बसविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा कर्तृत्वान वारसा माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख आणि अड. अविनाशदादा देशमुख या मुलांनी पुढे नेला आहे. अशा या कर्तृत्ववान तरीपण काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या दादांना लाल सलाम !!
प्रा. डॉ. सतीश कदम, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, मुंबई.