
www.janvicharnews.com
(हेरंबकुलकर्णी)
घोडेबाजारातून लपत छपत लोकशाही ,
‘सत्तेच्या दलालांपासून
रक्षण कर ‘
म्हणून न्यायदेवतेकडे राखी घेऊन गेली तर
न्यायदेवता स्वतः च संसदभवनाकडे रक्षणाची साद घालायला गेलेली
डोळ्यांची पट्टी काढून तीच राखी म्हणून बांधत होती
तेव्हा संसदभवन
सिंहाची प्रतिकृती, नेमकी कशी असावी ?
या परिसंवादात मग्न होती…
तशीच मग लोकशाही
चौथ्या स्तंभाला राखी बांधायला गेली
तेव्हा डोळ्यात पाणी आणून
ते म्हणाले ” आम्ही देशाला जरूर लोकशाही सांगतो पण मीडिया हाऊसमध्ये लोकशाही नसते “
ही ब्रेकिंग न्यूज ऐकताच
तिने
कोलमडलेल्या चारही स्तंभाना तरीही राखी बांधली.
तशीच निराश होऊन ती राजघाट च्या रस्त्यावर आली..
तेव्हा सरकार एका हाताने जनतेला रेशन
आणि
उद्योगपतींना धनादेश वाटत होते .
तिने त्याबद्दल प्रश्न विचारताच
ईडीचे अधिकारी
समन्स दाखवत
तिला तिच्या संपत्तीविषयी प्रश्न विचारू लागले…
तेव्हा तिने त्यानाही रक्षण कर म्हणून राखी बांधली
आणि
न्यायदेवतेकडून काळी पट्टी घेऊन स्वतःच्याच डोळ्यावर बांधून टाकली..
हेरंबकुलकर्णी