वनस्पतींसाठी पालाश (पोटॅश) अन्नद्रव्यांचे महत्व
–श्री.सतिश भोसले
नमस्कार शेतकरी बंधूनो,

janvicharnews.com
आज आपण वनस्पतीच्या जडणघडणीसाठी पालाशचे काय महत्व आहे ते पाहणार आहोत. वनस्पती शरीरात कुठलाही अन्नघटक एक एकटा काम करीत नाही. वनस्पतीच्या सर्वांगीण वाढीसाठी व उत्पादनासाठी एकूण 17 अन्नद्रव्यांची गरज असते. कर्ब, हायड्रोजन, ऑक्सिजन ही हवा व पाण्याद्वारे पिकांना मिळतात. मुख्य अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद व पालाश हे आहेत, तर दुय्यम अन्नद्रव्यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व गंधकाचा समावेश होतो. शिवाय लोह, जस्त, तांबे, बोरॉन, मंगल, मॉलिब्डेनम, क्लोरिन व कोबाल्ट ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना लागतात. मुख्य अन्नद्रव्यांमध्ये पालाशचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पालाश सर्व पिकांच्या उत्पादनवाढीसाठी व गुणवत्ता सुधारण्यासाठी अवश्य आहे.
पीक उत्पादनात पालाश अन्नद्रव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक पिकास खते देण्याअगोदर माती व पर्णदेठ परीक्षण करून अन्नद्रव्याची मात्रा ठरविणे गरजेचे आहे. अवर्षणप्रवण क्षेत्रात पालाशचा वापर केल्यास फळबागा तग धरू शकतात.
पालाश एक प्रमुख पोषक अन्नद्रव्य :-
पालाश या पोषक घटकांचा उपयोग निश्चित प्रमाणात केला पाहिजे, अन्यथा पीक उत्पादन कमी होईल, तसेच मातीच्या उत्पादनक्षमतेचा ऱ्हास होईल. मातीची उत्पादनक्षमता कमी होण्यामध्ये पालाश या पोषक घटकाचा असंतुलित वापर हे मुख्य कारण आहे. पालाश पिकासाठी महत्त्वाचा आवश्यक व प्रमुख पोषक घटक आहे. भारतामध्ये तृणधान्ये मोठ्या प्रमाणात घेतात. तृणधान्यासाठी आदर्श रासायनिक खतांचे नायट्रोजन ः पालाश गुणोत्तर 4:1 अथवा 4:2 असावे. सर्व पिकांसाठी पालाश हा एक महत्त्वाचा घटक हे त्याच्याशिवाय पिकाची वाढ व विकास होऊ शकत नाही. पालाशच्या वापरामुळे पिकांची कार्यक्षमता वाढते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व त्यामुळे पिकास पाणी कमी लागते. पीक अवर्षणग्रस्त परिस्थितीत तग धरू शकते.
पालाश हे अल्कधर्मीय मूलद्रव्य असून निसर्गतः ते खडक व जमिनीत आढळते. जमिनीतील पालाशचे एकूण प्रमाण 2.3 ते 2.5 टक्के इतके असते. पालाश जमिनीतील धनविद्युत प्रभारित द्राव्य, विनिमय व अविनिमय स्वरूपात आढळून येते. त्यापैकी धन विद्युत प्रभारित द्राव्य तसेच विनिमय स्वरूपातील पालाशचे शोषण पिकामार्फत होते. जमिनीतील एकूण पालाशपैकी 92.98 टक्के पालाश मुळांना न मिळणाऱ्या प्राथमिक खनिजांच्या स्थिर अवस्थेत व 1.10 टक्का पालाश अविनिमय स्वरूपात असतो.
पालाशचे कार्य :-
पालाशच्या वापरामुळे पिकांची कार्यक्षमता वाढते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व त्यामुळे पिकास पाणी कमी लागते. पीक अवर्षणग्रस्त परिस्थितीत तग धरू शकते. पालाशमुळे पीक लोळत नाही. शर्करा व प्रथिने यांची निर्मिती होते. रोग प्रतिकारशक्ती वाढते. नत्र या अन्नद्रव्यांबरोबर पालाश दिल्यास पिकांची चांगली वाढ होते, गुणवत्ता आणि प्रत सुधारते. शर्करायुक्त पदार्थ वाहून नेण्याची क्षमता आणि साठवण वाढते. उसातील रसाचे प्रमाण वाढते. तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी होते. तसेच साखरेचे प्रमाण वाढते. पिकांमधील पेशीची वाढ चांगली होते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियांना पालाश चालना देते, त्यामुळे पिष्टमय पदार्थ तेल व प्रथिने तयार होतात. साठपेक्षा जास्त विकरांना व संजीवकांना पालाश क्रियाशील करते व पीकवाढीच्या प्रक्रियांमध्ये हातभार लावते. प्रथिनांच्या निर्मितीला उद्युक्त करून नत्र खतांची क्रयशक्ती वाढवते. पिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवते व पिके रोगराई, कीटक, वाईट हवामान यांच्याशी मुकाबला करू शकतात. जैविक नत्राची उपलब्धता व स्थिरता वाढवते.
पालाश व पीक गुणवत्ता :-
तृणधान्य पिकांच्या प्रतीमध्ये सुधारणा होते. कडधान्य पिकांत मुळांवरील गाठींची संख्या व वजन वाढीस उत्तेजन देते व जैविक नत्र स्थिरीकरणास मदत होते. तेलबिया पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. नत्राचा योग्य प्रमाणात वापर होऊन प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. बियांचे वजन व आकारमान वाढते.
पालाशच्या कमतरतेची लक्षणे :-
पानांच्या कडा फिकट होऊन करपतात. जुनी पाने पिवळी होऊन खाली मुडपतात. पिकांची वाढ खुंटते. मुळांची व खोडांची वाढ चांगली होत नाही. धान्य खराब निपजते व उत्पन्न घटते. पीक उत्पादनाचा दर्जा खालावतो. कीड, रोगराई, दुष्काळ, धुके यांच्या विरुद्धची प्रतिकारशक्ती कमी होते. उसाच्या पानांची टोके मरतात. कापसाची पाने तपकिरी, जांभळ्या रंगाची व जाडसर टणक होऊन गळून पडतात. सोयाबीनची पाने पिवळसर होऊन पुढे सुकलेल्या सांगाड्यासारखी होतात. केळीमध्ये फ्युजॅरियम विल्ट, तर टोमॅटोमध्ये बॅक्टेरिअल ब्लाईट हे रोग वाढतात. भाजीपाला व फळांची टिकण्याची क्षमता कमी होते. गळिताच्या पिकात तेलाच्या प्रमाणात घट होते. द्राक्षाचे घड लहान होतात, तसेच घड उशिरा तयार होतात. मणी एकसारखे पिकत नाहीत.
पालाशयुक्त खते :-
पालाशयुक्त खतांमध्ये प्रामुख्याने सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समावेश होतो. सेंद्रिय खतात शेण खत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, गांडूळ खत, प्रेसमड केक (मळी), कोंबडी खत यांसारख्या भरखताचा समावेश होतो. यातील पालाश पिकांना हळूहळू उपलब्ध होतो. जोरखताचा वापर न केल्यामुळे व सतत पिके घेतल्याने जमिनीतील पालाशचा पुरवठा कमी होत जातो आणि पीक उत्पादनात घट होते. बाजारामध्ये प्रामुख्याने म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅश ही दोन प्रकारची पालाशयुक्त खते उपलब्ध होतात. हे खत प्रामुख्याने खाणीतून खनिजांपासून तयार केले जाते. त्या खनिजांच्या खाणी जर्मनी, अमेरिका, रशिया, जॉर्डन, चीन, कॅनडा, ब्राझील, थायलंड, फ्रान्स, इंग्लंड, चिली, इस्राईल, इटली आणि स्पेन देशांत आहेत. भारतास दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागते. ही दोन पालाशयुक्त खते 100 टक्के आयात करावी लागतात. तसेच ही खते पिकांस दिल्यानंतर संपूर्णपणे पिकाला मिळत नाहीत. निचऱ्यातून आणि स्थिरीकरणामुळे बराचसा पालाश पिकांना उपलब्ध होत नाही.
सर्वसाधारणपणे गरजेप्रमाणे स्फुरद आणि पालाश, सिलिकॉन व पालाश आणि तिघे एकत्र शिवाय त्यांच्याबरोबर इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये अशी एकत्रितपणे पिकाच्या शरीरात त्यांची कामे चालतात. या संदर्भात पिकांचे पोषण संरक्षणातील पोटॅशचे महत्त्व आणि तो उचलून घेण्यासाठी लागणारी शक्ती याविषयी आपण माहिती घेत आहोत.
जर्मन शास्त्रज्ञ जस्टस लेबिग याने प्रयोगशाळेत वनस्पती जाळून राखेचे पृथःक्करण केले तेव्हा त्यात त्याला नत्र, स्फुरद, पालाश हे तीन घटक आढळले. तेव्हापासून या तीन घटकांचे ‘शेतीसाठी अत्यावश्यक घटक’ या सदरात वर्गीकरण झाले. नत्र, स्फुरद, पालाश संस्कृतीचा जनक म्हणून जस्टस लेबिग यांना ओळखले जाते. वनस्पती शरीरात कुठलाही अन्नघटक एक एकटा काम करीत नाही.
सर्वसाधारणपणे गरजेप्रमाणे स्फुरद आणि पालाश, सिलिकॉन व पालाश आणि तिघे एकत्र शिवाय त्यांच्याबरोबर इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये, अशी एकत्रितपणे पिकाच्या शरीरात त्यांची कामे चालतात. या संदर्भात पिकाच्या पोषण – संरक्षणातील पोटॅशचे महत्त्व व तो उचलून घेण्यासाठी लागणारी शक्ती याविषयी शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे.
स्फुरद हा उत्पन्न ठरविणारा घटक आहे, तर पोटॅश हा शेती उत्पादनाची गुणवत्ता ठरविणारा घटक आहे. उत्पादनाची चव, रंग, तजेला, टिकाऊ क्षमता हे गुण मुख्यतः पोटॅशच्या उपलब्धतेवर ठरतात. म्हणजे स्फुरद व सिलिकॉन हे दोघंही इमारतीच्या पायाच्या दगडाप्रमाणे काम करतात, तर पोटॅश हा कळस चढवितो. पालाश व सिलिकॉन यांची कामे, विशेषतः ताण नियोजनाच्या कामात सारखी आहेत. सिलिकॉन कायम अप्रत्यक्षपणे कामे करतो, तर पालाश प्रत्यक्ष पिकाच्या वाढीतील महत्त्वाचा घटक आहे.
येणाऱ्या काळात शेती उत्पादनवाढीचे मोठे आव्हान असणार आहे. कारण वातावरण बदलातील ताणांमुळे पिकावर विविध प्रकारचे जैविक व अजैविक ताण येतात. या ताणाला सामोरे जाताना पिकाची अन्नघटकांची गरज बाहेरून खते देऊन मोठ्या प्रमाणावर भागविली जात आहे; पण अतिरिक्त नत्र तर पालाश व स्फुरदाची कमतरता यामुळे जवळजवळ सर्व पिकांची उत्पादने व त्यांची गुणवत्ता सतत घटते आहे. सर्व तणांना तोंड देण्यात सिलिका व पालाशची उपलब्धता निर्णायक ठरणार आहे.
पोटॅशच्या उपलब्धतेमुळे पीक सहन करते ताण –
दुष्काळाचा ताण :–
१) दुष्काळी परिस्थितीत पानांमागे असणारी पर्णरंध्रे बंद राहणे व पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी होऊन पिकाच्या शरीरात जास्त काळ पाणी टिकण्यामध्ये पोटॅश मदत करते.
शास्त्रज्ञांच्या मते पोटॅशच्या कमतरतेमुळे दुष्काळी परिस्थितीत पानात इथिलिनची जास्त निर्मिती होते. त्यामुळे स्टोमॅटा पेशींवर होणाऱ्या ॲबसिसिक ॲसिडच्या क्रियेत अडथळा येतो. त्यांचे बंद होणे टाळले जाते. याचा प्रतिकूल परिणाम कार्बनडाय आॅक्साइड शोषून घेण्यावर व पर्यायाने प्रकाशसंश्लेषणावर होतो. त्यामुळे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेशिजची निर्मिती वाढते. क्लोरोफिल व पेशी आवरण यांचे विघटन सुरू होते. कालांतराने पान मरते.
२) पेशी आवरणाची स्थिरता, मुळांची वाढ, पानांचा आकार; तसेच पिकाचे एकूण वजन दुष्काळी परिस्थितीतही वाढविण्यासाठी पोटॅशची गरज असते. त्याचाच अनुकूल परिणाम पाणी शोषून घेणे, पिकात टिकवून ठेवणे यावर होतो.
क्षारांचा ताण :–
१) पालाशची कमतरता असेल तर क्षाराचा ताण सहन करायची पिकाची शक्ती कमी होते. कारण या ताणाच्या काळात पिकामध्ये नत्र व प्रकाशसंश्लेषणात कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेण्यात अडथळे निर्माण होतात. पिकाची वाढ, उत्पादनक्षमता; तसेच पीक जिवंत राहण्याची क्षमता यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.
२) पालाशची कमी व सोडियमचे अधिक प्रमाण याने पेशीद्रव्यातील K+/Na+ यांचे गुणोत्तर कमी होते. त्याचा परिणाम मुळांच्या आयन देवाण-घेवाणीच्या शक्तीवर होतो.
पालाश व कमी तापमानाचा ताण :–
थंड हवामानात जर पिकात पालाशची कमतरता असेल तर पीक गारठलेल्या अवस्थेत जास्त पाणी उचलू शकत नाही. पेशींमध्ये कोरडेपणा येतो. गारपीट/ बर्फ यांच्या काळात त्यांच्यापासून संरक्षणासाठी जी विकरे पिकात तयार व्हायला लागतात, त्यांची निर्मिती खुंटते; तसेच पेशी आवरणातून इतर अन्नघटकांचे आयन, पाणी व चयापचयात तयार झालेली द्रव्ये यांच्या देवाण-घेवाणीत अडथळे निर्माण होतात. परिणामी अनेकदा बीजनिर्मिती होऊ शकत नाही.
पालाश व पाणी साठून राहिल्याने निर्माण होणारा ताण :–
जमिनीत पाणी बराच काळ भरून राहिले तर मुळांचे श्वसन नीट होत नाही व त्यांच्या पेशी शक्तिहीन होतात. याचा परिणाम म्हणून पर्णरंध्रांची उघडझाप, प्रकाशसंश्लेषण यावर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच मुळांभोवती सल्फाइड, लॅक्टिक ॲसिड, ॲसेटिक व फॉर्मिक ॲसिड इत्यादी विषारी द्रव्ये विविध अभिक्रियांमधून तयार होऊन साठून राहतात. त्याचा परिणाम पेशी आवरण फाटण्यात होतो. या काळात जर पालाशची उपलब्धता झाली तर K+, Ca, 2+ N, Mn 2+, Fe 2+ हे आयन योग्य त्या प्रमाणात उचलले जातात. (अश्रफ इ.)
पालाशचे महत्व :–
१) पालाशची पिकामधील उपलब्धता मुख्यतः आयनच्या देवाण-घेवाणीतून होत असते. हा उचललेला पालाश पिकामध्ये होणाऱ्या चयापचयाच्या क्रियांचे नियंत्रण करतो.
२) प्रकाशसंश्लेषण क्रियेत या घटकाचा महत्त्वाचा सहभाग आहे. अपुऱ्या पालाशमुळे श्वसनाची गती वाढते. प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते. त्यामुळे पिकाच्या विविध भागांकडे कार्बोहायड्रेट्सचा पुरवठा कमी होतो.
३) पेशींमधील विविध आयन्सचे संतुलन राखले जाते.
४) लोहासारख्या जड धातूचे चलनवलन सुव्यवस्थित होते.
५) पालाशमुळे कार्बोहायड्रेट्स – साखर तयार होते; पण प्रथिने तयार करण्यातही त्याचा वाटा आहे.
६) पिष्टमय पदार्थांच्या घडणीबरोबरच विघटनाची क्रियासुद्धा मार्गी लागते. या विघटनातूनच पिकाच्या वाढीसाठी लागणारी ऊर्जा मुक्त होते.
७) पीक फुलावर येण्यासाठी तसेच फळधारणेसाठी लागणारी विकरे, जैवरसायने तयार होण्यासाठी पालाश अत्यावश्यक आहे.
८) जवळजवळ ६० प्रकारच्या विकरांच्या क्रियांना चालना मिळते. त्यामुळे चयापचयाची क्रिया सुनियंत्रित होते.
९) पालाशमुळे पिकातील साखर वाढून उत्पादनात वाढ होते.
१०) रोगांचा प्रादुर्भाव, कमी पाणी आणि तापमानातील बदल यामुळे पिकावर येणाऱ्या ताणाला तोंड देण्यासाठी पालाश व सिलिका हातात हात घालून काम करतात…!!!
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!
* शेतकरी हितार्थ *
—-
*!! अन्नदाता सुखी भव: !!*
*काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो*
*”Agriculture is my Love, Passion, Culture & Life”*
*विचार बदला! जीवन बदलेल!!*