शिवछत्रपतींचे गुरू कोण? : तथ्य आणि मिथ्य

काही दिवसापूर्वी “अगर समर्थ रामदास न होते तो शिवाजी को कोण पूछता!” असे उद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी काढले होते. शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले! मराठ्यांच्या साम्राज्याचे संस्थापक म्हणून संपूर्ण विश्वामध्ये त्यांना गौरवले जाते! शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केला; जी स्वराज्याची निर्मिती केली याचे सगळे श्रेय हे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील काही समाज – व्यक्ती हे रामदास स्वामी यांना देत आहेत. रामदास स्वामी यांचे कर्तृत्व त्यांची पार्श्वभूमी ही कल्पनेची पुटं चढवून वाढवलेली आहे. हे इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येते. शिवछत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय रामदासांची ओळख निर्माण होऊ शकत नाही हे वास्तव आहे! पण गेली दोन शतके महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर शिवछत्रपतींचे मार्गदर्शक गुरु रामदास होते हे समाज मनावर ठसविण्यासाठी अनेक कथा – दंतकथा या रचल्या गेल्या, अनेक पुस्तकेही लिहिली गेली. एवढेच नाही तर खोटी कागदपत्र ही तयार केली गेली. ही कागदपत्रे बोगस आहेत हे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा वारंवार ही कागदपत्रे वेगवेगळ्या माध्यमातून पुढे आणून शिवछत्रपती आणि रामदासांचा संबंध दृढ करायचा प्रयत्न केला जात आहे. विशिष्ट विचारसरणी वारंवार शिवाजी महाराज आणि रामदास यांची एकत्रित चित्रे ही सगळीकडे प्रसारित करून आणि वेगवेगळ्या वक्त्यांच्या तोंडातून शिवाजी महाराज हे रामदास स्वामींनी निर्माण केलेले एक व्यक्तिमत्त्व आहे, रामदास स्वामींच्या मार्गदर्शनाशिवाय श्री शिवछत्रपती हे काहीच नव्हते असं समाज मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात. भगतसिंग कोषारींनी जे वक्तव्य केलं ते सुद्धा शिवाजी महाराज आणि रामदास हे समीकरण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा किती खोल रुजवण्यात आलेले आहे, हे दाखवून देणारे आहे.

मराठ्यांच्या इतिहासामध्ये रामदासांचे नेमके स्थान काय? आणि शिवछत्रपतींना त्यांनी मार्गदर्शन केले काय? याविषयी अनेक लोक विचारणा करत असतात. याविषयीचा हा व्हिडिओ मी या पोस्टमध्ये पोस्ट केला आहे. शिवछत्रपती आणि रामदास यांच्याबद्दलची जी अस्सल कागदपत्रातून माहिती मिळते ती माहिती या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवछत्रपती हे स्वयंभू व्यक्तिमत्त्व होतं ते शककर्ते होते. आणि अशाच शककर्त्याचं गुरुपद घेण्याची – देण्याची आहमिका ही आज सुद्धा सुरू आहे. महाराष्ट्राच्या काही भागात तर रामदासी बैठकांचा सुळसुळाट झाला आहे. या बैठकांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करत असलेल्या लंगोटीधारी रामदासांचे चित्र घराघरांमध्ये पोहोचवण्यामध्ये या बैठकांचे चालक हे खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. शिवछत्रपतींच्या जडणघडणीमध्ये आणि स्वराज्याच्या उभारणीमध्ये यत्किंचितही स्थान नसणाऱ्या एका व्यक्तीला शिवछत्रपतींचे मार्गदर्शक म्हणून संपूर्ण समाज मनावर बिंबवण्याचे काम अशा बैठकीमधून होत आहे. हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे.

रामदास स्वामींचा आध्यात्मिक विचार वेगळा आणि शिवाजी महाराजांचा राजकीय विचार वेगळा. शिवाजी महाराजांचा रयतेचे स्वराज्य निर्माण करायचा विचार वेगळा आणि रामदासांचा एका वर्णाचा, एका जातीचं पुढारपण लोकांवर थोपण्याचा विचार वेगळा. हे आपण कधी समजून घेणार ?

इंद्रजित सावंत

कोल्हापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top