shekhar S

www.janvicharnews.com
निवडणुकीच्या परिक्षेत हिंदुत्व हा स्कोअरींग सब्जेक्ट आहे. सर्व नेते आणि पक्ष जेव्हा परिक्षेला बसतात तेव्हा ते ” गरिबी, महागाई, अल्पसंख्याक, हिंदुत्व, नोकरी” अशा विविध विषयांवर निबंध लिहीतात आणि वाचून दाखवतात. त्यानुसार मतदार त्यांना गुण किंवा मत देतात. इथे परिक्षक ( पेपर तपासणारा) / गुण देणारा मतदार एकावेळी एकच गुण देऊ शकतो.
शाळेत जसा निबंध लिहीताना आदर्शवाद असतो तसा इथेही असतो. थोरामोठ्यांची नावं घेत, जात धर्म याचा निर्वाळा देत पास होतात सगळे. ज्यांचा अभ्यास कच्चा असतो ते परिक्षकांना पैसे व भेटवस्तू सुद्धा देतात.
१० वी म्हणजे नगरसेवक, १२ वी म्हणजे आमदार, पदवी म्हणजे खासदार, पी एच डी म्हणजे केंद्रीय मंत्री.
परिक्षा संपली की सगळे पाठ्यपुस्तकं रद्दीत देतात, त्या पैशातून गोळ्या बिस्कीटं खातात.
हे झालं पक्ष आणि नेत्यांचं, त्यांना आपण का परिक्षेला बसलो ते माहीत नाही, पास झालो तर संसदेत नोकरी मिळेल त्यातून कुटुंबाची सोय करायची एवढीच टिपीकल भारतीय कौटुंबिक विचारसरणी बाळगायची असते. ती नोकरी सरकारी असते, पेन्शन मिळते व पैसे खायला मिळतात. जाऊ दे, त्यांना नाही कळत…
पण परिक्षक म्हणजे जनतेचं काय? त्यांनाही कळत असतं दैनंदिन जीवनात की आपल्याला काय हवं, पण परिक्षा/ निवडणुक आली की अभ्यास सोडून सगळं बघतात. विषय काय असतो? पाणी, वाहतूक, जीवनावश्यक वस्तू पुरवठा, सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था. हे विषय मांडताना जर भरकटत सगळे इथे तिथे गेले तर नका देऊ त्यांना गुण (मत). तुम्ही काय पहाता? गणवेश, बॅग, वाॅटरबॅग, वह्यांची कव्हर?
अरे मूळ विषय काय? अभ्यास केला का? हुशार विद्यार्थी पाहूनच गुण द्या. तो घरी कसा वागतो? दगड मारतो का? तुम्हाला काय करायचंय? प्रत्येक चांगल्या डाॅक्टरचा मुलगा आणि नातू डाॅक्टरंच असतो का? बरं झालाच डॉक्टर तर चांगला असतोच का? मग घराणेशाहीचे उमेदवार का निवडता?
विषय बघा, अभ्यास केला का पहा तर द्या गुण आणि करा पास नाहीतर करा नापास.